पुणे – तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर लगेच डेक्कन पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडले.
नुकत्याच झालेल्या तलाठीभरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ झाला असून, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे वारंवार समोर आले आहे. यामुळे प्रामाणिकपणे वर्षोनुवर्षे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या सर्व प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले होते.
जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्धार महाराष्ट्रभर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रवीणकुमार बिरादार, प्रथमेश अबनावे, रोहन सुरवसे, अनिकेत नवले, तारीक बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. स्पर्धा परीक्षेबाबत सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभाराविरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्यास सरकार हुकूमशाही पद्धतीने मनाई करत असली तरी युवक काॅंग्रेस विद्यार्थ्यांसाठी हा लढा लढणार असल्याचे अक्षय जैन यांनी सांगितले.