Sanjay Shirsat : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मागील अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र अद्याप तरी हा विस्तार झाला नाही. दरम्यान, याच मंत्रिमंडळ विस्ताराविषयी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ‘जयंत पाटील भाजपबरोबर (BJP) येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता’, असे शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या कार्यालयात संजय शिरसाट माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील यांच्याविषयी बोलतांना शिरसाट यांनी, “भाजपबरोबर जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चा झाली होती, आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे, आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
तसेच पुढे बोलताना, जयंत पाटील यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही,” असेही शिरसाट म्हणाले. दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील शिरसाट यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून केलेल्या आरोपाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, “राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम नाही. कोणी पक्षाचा हा कार्यक्रम नाही. राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात लागलेला आहे. हा एक आनंदाचा क्षण असून, त्यात मिठाचा खडा कोणी टाकु नये. कारसेवक सर्वच पक्षाचे होते,” असे शिरसाट म्हणाले आहेत.
एवढेच नाही तर संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. “संजय राऊत यांना संध्याकाळी देव पार्टीला जाण्यापासून प्रॉब्लेम झाला असेल, म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. रेव पार्टी, नाईट लाईफ हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना चांगलं माहिती आहे,” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.