संगमनेर – विकासाची मोठमोठी उड्डाणे भरणाऱ्या संगमनेर शहरातील सांडपाण्याच्या प्रश्नाचे घोंगडे गेल्या अनेक वर्षांपांसून भिजत पडले आहे. शहरातील विविध लहान – मोठ्या गटारीतून दूषित पदार्थ मिसळून वाहणारे सांडपाणी शहराजवळच्या म्हाळुंगी नदीच्या पात्राजवळून प्रवरा नदीत सोडले जाते. दूषित सांडपाणी मिसळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळ्यासह भंडारदरा व निळवंडे धरणाच्या आवर्तनाच्या वेळी प्रवरा नदी वाहती होत असल्याने हे सांडपाणी मिश्रित दूषित पाणी पूर्व भागातील प्रवरा नदीच्या कडेला तसेच काही अंतरावरील गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तसेच सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेमार्फत परिसरातील गावांना पुरवले जाते.
थेट आरोग्याशी होणाऱ्या या खेळाच्या विरोधात लाभार्थी गावांमधील नागरिकांनी अनेकदा सरकार दरबारी अर्ज, विनंत्या केल्या’. अनेकदा आंदोलनाचे हत्यारही उपसले गेले. तालुक्यातील बाधित गावांमधील खासगी मालकीच्या विहिरी व इतर जलस्त्रोतांवरही या सांडपाणी मिश्रित दूषित पाण्याचा परिणाम होत असल्याने अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील रायते, वाघापूर, कोल्हेवाडी, सुकेवाडी, खांजापूर, चंदनापुरी, झोळे, देवगाव, रायतेवाडी आदी गावांच्या पाणीपुरवठा योजना व तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत हे गटाराचे पाणी मिश्रित होत आहे. या सांडपाण्यात रासायनिक घटकांसह संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्याच्या परिसरातील नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यात रक्त व मांसाचे तुकडेही मिळून येत असल्याचा आरोप होत आहे.
या सर्व समस्येवर ठोस उपाोजना करण्यासाठी संगमनेर नगपरिषदेने तांत्रिकदृष्ट्या योग्य त्या जागेचा शोध घेऊन तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, या प्रकल्पामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील, या भीतीने मोठ्या समुदायाने या प्रकल्पाला तीव्र विरोध केल्याने या प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले. या प्रकल्पासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागेचा शोध अद्यापही सुरू आहे. रेंगाळलेल्या प्रकल्पामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नित्याप्रमाणे प्रवरेत मिसळत आहे.
या दुर्गंधी असलेल्या पाण्याचा वापर स्वयंपाकासह सर्व कामासाठी करावा लागतो. रक्त मांसांचे तुकडे असलेल्या या दूषित पाणीपुरवठ्याविरोधात स्थानिक नेते व नगरपरिषदेला अनेकदा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. मात्र, आजवर त्याला यश मिळाले नाही. केमिकलयुक्त पाण्यामुळे प्रवरेतील मासे मृत झाले असून, नदीतील पाणीही काळ्या रंगाचे दिसत आहे.
सुभाष कुटे, उपसरपंच, सुकेवाडी
दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजूर केलेल्या सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पासाठी तब्बल ९८ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. मात्र, योग्य जागेअभावी हा प्रकल्प मार्गी न लागल्याने शहरालगतच्या गावांना अजून किती दिवस दूषित पाणी प्यावे लागेल, असा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडला आहे.
गणपत परबत, ग्रामस्थ, निंबाळे