जेऊर, मांडकी, वीर, परिंचे भागातील शेतकऱ्यांचा आरोप
नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा – जेऊर रस्त्यावरील तसेच पुणे-मिरज लोहमार्गावरील जेऊर फाटा येथे रल्वे प्रशासनाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने भुयारी मार्ग केल्याचा आरोप पुरंदर तालुक्यातील जेऊर, मांडकी भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच भुयारी मार्गातूनच ड्रेनेजच्या पाइपलाइनमधून पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून भुयारी मार्गात होत असलेले अपघाता, तसेच भविष्यात ऊस वाहतूकीवेळी होणारे अपघात यामुळे ऊस वाहतूक कशी होणार ? अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागली आहे.
पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील मांडकीसह पाणीपुरवठा यासंस्थेच्या सभागृहात नुकतीच जेऊर, मांडकी, वीर, परिंचे परिसरातील 10 ते 12 गावांतील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी शेतकऱ्यांनी नीरा-जेऊर मार्गावर पिंपरे (खुर्द) गावच्या हद्दीत पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील गेटच्या (नंबर 28 किलो मीटर क्र. 80/4-5) (जेऊर फाटा) ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडूूून नव्याने भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यात आला आहे.
या रेल्वेच्या अरुंद भुयारी मार्गातून भविष्यात होणाऱ्या ऊस वाहतुकीच्या अडचणींच्या समस्या मांडल्या. हा भुयारी मार्ग रेल्वे विभागाने चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, संचालक विश्वास जगताप, अनंता तांबे, माजी संचालक रामचंद्र जगताप, राहुल तांबे, मोहन जगताप, उपसरपंच बाळासाहेब जगताप, माजी उपसरपंच विश्वास जगताप, माजी सरपंच सतीश जगताप, लिफ्ट संस्थांचे अध्यक्ष दशरथ जगताप, दशरथ शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत अंकुश जगताप यांनी तर पोलीस पाटील प्रवीण जगताप यांनी आभार मानले.
त्यावेळी दोन फूट पाणी साचले
भुयारी मार्गाला अवघड वळण व अवघड चढण उतार दिले आहेत. जेऊर बाजूने येणाऱ्या वाहनाल नीरा बाजूकडून येणारे वाहन सहजासहजी दिसून येत नाही. त्याचबरोबर दोन्ही बाजूनं तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे जिकरीचे होणार आहे. मागील आठवड्यात मध्यम स्वरूपाचा एक तास पाऊस झाला होता. त्यावेळी भुयारी मार्गात दोन फूट पाणी साचल्याचे स्थानिकांनी सांगितले.