नीरा डावा कालवा
भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या हद्दीत असलेल्या नीरा डावा कालव्याचे निंबोडी पूल येथे सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. 22) दुपारी बंद पाडले. कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रताप रायते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम निंबाळकर, नानासाहेब निंबाळकर, सचिन गायकवाड, आकाश झगडे, दिलीप घोळवे, वैभव नरुटे, गणेश घोळवे, अमोल गायकवाड, कुमार आंबोले, किसन भोईटे, सचिन खोमणे, सदाशिव वनवे, सुप्रीत झगडे, आदींसह मोठ्या संख्येने सणसर, भवानीनगर, निंबोडी, शिंदेवाडी, काझड, लाकडी या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
नीरा डावा कालव्यामध्ये निंबोडी पुलाजवळ अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. कालव्याच्या अस्तरीकरणामुळे कालव्यातील पाण्याचा पाझर बंद होऊन विहिरी कोरड्या पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी हस्तरीकरणाचे काम बंद पाडले.
…अन्यथा रस्त्यावर उतरणार
बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील नागरिकांनी नीरा डाव्या कालव्याला होणाऱ्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध केल्याने या भागातील अस्तरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून थांबवण्यात आले; परंतु इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण सुरू असल्याने हे अस्तरीकरण थांबणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. याही भागातील शेतकरी नीरा डाव्या कालव्याला अस्तरीकरण झाले तर रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे याही भागातील तालुका प्रतिनिधींनी सर्व शेतकऱ्यांचा विचार करून असे नीरा डाव्या कालव्याला होणारे अस्तरीकरण थांबवावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केले आहे.
वडीलधाऱ्या लोकांनी शेतीला पाणी उपलब्ध होईल या अपेक्षेने नीरा डावा कालव्यासाठी जमिनी दिल्या होत्या. कालव्याचे अस्तरीकरण झाल्यानंतर कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनी केवळ पाण्याकडे बघत बसायचे का? कालव्याचे मुरमीकरण झाल्यानंतर कालव्यातील पाण्याचा किमान 70 टक्के पाझर बंद झाला आहे. कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने कालव्याचे मुरुमीकरण खोलीकरण रुंदीकरण करावे; परंतु अस्तरीकरण करू नये.
-संग्राम निंबाळकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती