पिंपळे गुरव – साठ फुटी रोडवरील मोरया पार्क या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा आणि आरोग्य विभागाचे अवजड वाहनामुळे येथील परिसरातील अरुंद रस्त्यावर दुपारच्या सुमारास वाहतूक कोंडी होऊन बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. याचा नाहक त्रास वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
मोरया पार्क येथील परिसरात दोन खासगी इंग्रजी माध्यमिक शाळा आहेत. या शाळांचे सकाळ सत्र आणि दुपार सत्र असल्यामुळे दुपारच्या सुमारास शाळा सुटताना व शाळा भरताना शाळेची वाहने तसेच अनेक पालक आपली दुचाकी घेऊन विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी अथवा नेण्यासाठी येथील अरुंद रस्त्यावरून ये-जा करीत असतात. याच दरम्यान गुरुवारी भर दुपारी बाराच्या सुमारास आरोग्य विभागाचे अवजड वाहन कचरा गोळा करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होते. आधीच रस्ता अरुंद त्यामध्ये आरोग्य विभागाच्या अवजड वाहनामुळे शालेय स्कूल बस, दुचाकी वाहने, तीनचाकी रिक्षा, चार चाकी वाहने एकाच वेळेला गर्दी करून आल्याने वाहतूक कोंडीमुळे पुरता फज्जा उडाला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अवजड वाहन भर दुपारी बाराच्या सुमारास येथील परिसरातील रस्त्याच्या कडेला असणारे कचऱ्याचे ढिगारे उचलण्यासाठी आले होते. याच दरम्यान अरुंद रस्त्यावर हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याच वेळी दुपारच्या सत्रात शाळेत विद्यार्थ्यांना सोडणारी शालेय वाहने, पालक वर्ग येत होती. तर शाळा सकाळ सत्राची शाळा सुटल्यावर अनेक पालक स्कूलबस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी होऊन ठप्प झाली. त्यातच संततधार पाऊस सुरू होता.
या वेळी परिसरातील नागरिकांनी वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यास अथक परिश्रम घेतले. काही वेळानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. या वेळी वाहन चालकांनी आरोग्य कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले. प्रशासनाने याबाबत दखल घेणे अत्यावश्यक आहे. आरोग्य विभागाने यापुढे शाळा सुटताना अथवा शाळा भरतेवेळी येथील परिसरात असे अवजड वाहन पाठवू नये. अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांचे पालक वर्ग तसेच शालेय स्कूलबस चालकांनी केली.
येथील परिसरात शाळा असल्यामुळे दुपारच्यावेळी सतत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. आरोग्य विभागाचे अवजड वाहन कचरा उचलण्यासाठी आल्यामुळे येथील परिसरात वाहतूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरले. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागला. शेवटी मी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत केली.
– सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते