पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विषयाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील तब्बल 40 टक्के प्रश्न विचारले. त्यामुळे या विषयाची परीक्षा विद्यापीठाने पुन्हा घेण्याचे जाहीर केले. याविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) शनिवारी विद्यापीठात आंदोलन केले.
विद्यापीठाच्या चुकीचा फटका आम्ही का सोसावा? पुन्हा परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्यावे, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली. एकदा पेपर दिल्यानंतर पुढील काही दिवसांत त्याच विषयाचा पेपर देण्याची आम्हा विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द करावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे मांडली. मात्र, परीक्षा न घेता गुण देणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेला सामोरे जावे लागेल, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर झालेल्या आंदोलनात युवक कॉंग्रेस सरचिटणीस अक्षय जैन, युवक कॉंग्रेस सचिव आदिनाथ जावीर, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सरचिटणीस महेश कांबळे, छात्रभारती पुणे जिल्हा सदस्य अजय बनसोडे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.