– विजय शेंडगे
भाकरीचा चंद्र गरजेचा की कवितेचं चांदणं सुखाचं, हा प्रश्न कवीला नेहमीच संभ्रमात पाडतो. कवितेपेक्षा कौटुंबिक जबाबदाऱ्या, आई-वडिलांची स्वप्नं अधिक महत्त्वाची आहेत याचं भान असणारा कवी आधी भाकरीचा प्रश्न मार्गी लावतो. कविता रिकाम्या पोटीही जन्म घेते आणि सुखाच्या गाद्या- गिरद्यांवर लोळत असताना आकार घेते. कविता लिहून समाधान मिळेल; परंतु भाकरीसाठी पोटातली आतडी आक्रोश करू लागतात. तेव्हा कागदाचे कपटे पोटात घालता येत नाही. कोंड्याचा मांडाच करावा लागतो. याचे प्रा. डॉ. केशव बोरकरांना भान आहे म्हणूनच त्यांच्या “दान महती’ या कवितेत ते म्हणतात-
देता याच काशी अन्न
क्षुधा होई शांत जाण
दारी आलेल्या भिक्षेकऱ्याला अन्नाचेच दान द्यावे लागते. तुम्ही त्याला भिक्षेत त्याच्या झोळीत कविता घालू लागलात तर त्याची भूक शांत होणार नाहीच. पण दान देण्याची तुमची क्षुधाही शांत होणार नाही. हे भान असल्यामुळेच भाकरीचा प्रश्न सुटत नाही तोवर कवितेच्या चांदण्यांकडे चकोर होऊन बघत राहिले.
आधी आयटीआय, मग एमए इंग्लिश, त्यानंतर डॉक्टरेट, प्राध्यापक हा बोरकरांचा प्रवास त्यांनी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी किती कष्ट घेतले, कशी पायपीट केली हेच दाखवून देतो. भाकरीचा प्रश्न सुटताच त्यांच्या मनात सुप्त अवस्थेत असलेली कविता कागदावर उतरली आणि “ग्रीष्मान्त’ या कवितासंग्रहाच्या रूपात रसिकांच्या भेटीला आली.
ग्रीष्मान्त हा बोरकरांचा पहिलाच कवितासंग्रह त्यामुळेच त्यांच्या कवितेत नावीन्याच्या काही खुणा सापडतात. तरीही त्यांची कविता कात टाकते आहे याची जाणीव होते. ती नव्याने उभारी घेते आहे, हे लक्षात येते.
प्रेम, निसर्ग, भारतीय परंपरा असे विभिन्न विषय हाताळताना त्यांची कविता व्यामिश्र मानवी जीवनाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करते. स्त्री-पुरुष प्रेमाचे शिवधनुष्य पेलताना दिसते. डॉ. बोरकरांची कविता शांत वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे आहे. ती भोगलेल्या वेदनेचा बाजार मांडत नाही. कारण जीवन एक रंगमहाल आहे याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच मृगजळ या कवितेत ते म्हणतात-
होयबा नायबाचे ते जग
क्षमता नि गुणवत्ता गौण जिथे…
असं असलं तरी त्यांनी त्या परिस्थितीतून मार्ग काढला आहे. आयुष्याची वाटचाल सुकर केली आहे. आधीचे कष्ट आणि त्यानंतर फुललेली सुखाची बाग यामुळेच त्यांना या कवितासंग्रहाला “ग्रीष्मान्त’ हे शीर्षक द्यावेसे वाटले असेल.
जालिंदर पावसे यांचे मुखपृष्ठ दुर्बोध नाही. परंतु हातात धरलेला लेखणीचा वृक्ष. त्याच्या निम्म्या भागावर पसरलेला शिशिर, त्या बाजूला विचारमग्न बसलेला तरुण तर त्याच वृक्षाच्या उर्वरित अर्ध्या भागावर फुललेला वसंत आणि त्या वसंतातून मार्गस्थ होणारे युगल हे डॉ. बोरकरांच्या आयुष्याचे प्रतीक वाटते.
प्रकाशन : परिस पब्लिकेशन
पृष्ठे : 120 मूल्य : 170