मुंबई – देशासह जगावर करोना महामारीचे संकट ओढावलेले होते. या काळातही बीएमसीवर निंयत्रण ठेवताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. करोनाबाधित रुग्णांनाही त्यांनी सोडले नाही. “कोविड-19’मुळे मरण पावलेल्यांसाठी बॉडी बॅग मुंबईत 5,000 रुपयांना खरेदी करत जनतेची लुट केली. तर ठाण्यात याच बॉडी बॅग 300 रुपयांना विकत घेतल्या गेल्या, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर आरोप केला.
राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेक पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प रखडले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर सरकारने ते पुन्हा सुरू केले आणि राज्याच्या विकासासाठी दुप्पट गतीने काम केली. राज्य सरकार आणि केंद्र समविचारी असतात तेव्हा राज्याचा विकास दुप्पट वेगाने होतो. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पालाही केंद्राची मंजुरी लवकरच मिळेल, असे ते म्हणाले.
आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. शिवसेना आणि भाजपाच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मी महायुतीला आणि राज्यातल्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो. मला वर्षभरापूर्वीचे दिवस आठवतायत. आपल्या राज्यात, मुंबईत, सगळीकडे, देशभर आणि जगभरात काय तो माहोल झाला होता. एक वेगळे वातावण आपल्याला पाहायला मिळाले. तेव्हाची परिस्थिती तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यावळी सर्वसामान्यांच्या मनात एकच विचार होता की, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं, त्यांच्या हक्काचं सरकार राज्यात स्थापन झाले पाहिजे.