इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या आणखीन 3 नेत्यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. दिनांक 9 मे रोजी झालेल्या दंगलींनतर “पीटीआय’च्या नेत्यांनी पक्षाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली असून यामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढायलाच लागल्या आहेत. “पीटीआय’च्या नेत्या मलिका बुखारी यांनी इस्लामाबादेत पत्रकार परिषदेत आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
दिनांक 9 मे नंतरच्या हिंसाचारानंतर त्यांनाही अटक केली गेली होती. जामीन मिळाल्यावर अदियाला तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर लगेचच बुखारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
आपल्याला सकारात्मक राजकारण करायचे आहे. कुटुंबाबरोबर देखील वेळ घालवायचा असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे आणखीन एक ज्येष्ठ नेते फिरदौस आशिक अवान यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या हिंसक आणि दहशतवादी कारवायांमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या शिवाय चीमा आणि त्यांच्या पत्नींनीही “पीटीआय’ला राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.
हिंसाचार हा राजकारणाचा भाग असू शकत नाही. यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलेलो नव्हतो, त्यामुळे आम्ही पक्षाचा राजीनामा देत आहोत.