मुंबई –“सध्या लोकशाहीवर आघात होत आहेत. ही समस्या दिल्लीची नसून पूर्ण देशाची आहे. दिल्लीत केंद्रसरकारकडून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यावर समर्थन मागण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत. आमचे त्यांना समर्थन आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर व्यक्त केले.
भाजप विरोधात मविआसह देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्रित येत असून त्याचाच एक भाग म्हणून केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी पवार यांची भेट घेतली.
उभय नेत्यांत झालेल्या बैठकीनंतर वाय. बी. चव्हाण सभागृहात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पवार यावेळी बोलताना पुढे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सर्वजण एकजुटीने मिळून भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करू. राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचे कंट्रोल असणारे विधेयक केंद्र सरकार संसद आणि राज्यसभेत ठेवणार आहे, त्याला आपण सर्वांनी विरोध करायला हवा.
“दिल्ली सरकारच्या अधिकारांवर केंद्र सरकार गदा आणत असून त्यासाठी भाजप सरकार विधेयकही आणणार आहे पण आम्ही ते विधेयक राज्यसभेत पास होऊ देणार नाही. देशातील लोकशाही वाचविण्याची गरज आहे. केंद्र सरकारविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत. सर्वांनी यासाठी एकत्र यावे हाच विचार आम्हीही करत आहोत,’ असेही पवारांनी पुढे बोलताना म्हटले.
आमच्यावर अन्याय झाला – केजरीवाल
केजरीवाल यावेळी म्हणाले, आमचे सर्व सहकारी शरद पवार व त्यांच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. 2015 मध्ये आमचे सरकार बनले होते. केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकाऱ्यांवरील कंट्रोल करण्याचे सर्व शक्ती हिसकावली. आमच्यावर अन्याय झाला होता. भाजपच्या त्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तेथे आमच्या बाजूने निर्णय लागला. आठ वर्षांत आम्ही ही लढाई जिंकली. पण आठ दिवसांत केंद्र सरकारने विशेषाधिकाराद्वारे अध्यादेश काढून पुन्हा हा विषय संसदेत नेला आहे. त्यामुळे आमचा अधिकार पुन्हा गमावला गेला. ते आता या मुद्द्याबाबत विधेयक सादर करणार आहेत. ते जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक ठेवतील तेव्हा ते परित होऊ नये त्याला विरोध व्हावा ही आमची मागणी आहे. हाच विषय घेऊन आम्ही आमच्या सहकारी विरोधकांना भेटत आहोत.
ही लढाई सेमीफायनलची
भाजप पैशांच्या जोरावर सरकार पाडून स्वतःचे सरकार स्थापन करते. तसेच ईडीसारख्या तपाससंस्थांचा लोकप्रतिनिधींच्या मागे लावून सरकार पाडते, त्याशिवाय अध्यादेश काढून सरकारला तोडण्याचे प्रकार करीत आहेत. राज्य सरकारला काम करू दिले जात नाही. हे विषय गंभीर आहे. आम्ही देशप्रेमींना देशातील राज्य सरकारांना आवाहन करतो की, अशी कृत्य करणाऱ्या भाजपविरोधात एकत्र यावे. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे आम्हाला सहकार्य लाभेल त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही हा संदेश द्यावा. भाजपच्या या विधेयकाला जर आपण पराभूत करू शकलो तर हे लोकसभा निवडणुकीचे सेमीफायनल आपण जिंकलो असे समजता येईल, असेही केजरीवाल यांनी यावेळी बोलताना म्हटले.