मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे. फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवू नये, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राजकारणाच्या पलीकडे जाऊन मातोश्री नाते जपते, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे हे नाते जपणारे नेते होते. मात्र, उद्धव ठाकरेंना त्याचा विसर पडला, अशी टीका फडणीसांनी केली होती. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही गद्दारांना मांडीवर घेतले नव्हते. गद्दारांना लाथ मारून हाकलून द्या, अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. फडणवीस तर गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काय वेळ आलीये फडणवीसांवर. त्यांच्याकडून बाळासाहेब शिकण्याइतकी वाईट वेळ अद्याप आमच्यावर आलेली नाही, असेही राऊतांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर टीका करताना फडणवीसांनी “सापनाथ-नागनाथ’ असा उल्लेख केला होता. याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, या देशात साप आणि नागांची पुजा केली जाते. त्यामुळे फडणवीसांच्या टीकेवर वाईट वाटण्यासारखे काहीच नाही.
देशभक्तांना दिल्लीत स्थान नाही
दरम्यान, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्याने विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यावर राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी आपला परदेश दौरा करून आता भारतात आले आहेत. त्यांनी प्रथम राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटावे व उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना बोलवावे. लोकशाहीवादी व देशभक्त लोकांना नरेंद्र मोदी आता दिल्लीत बोलावतच नाही. त्यांना फक्त चाटूगिरी करणारे व भक्तच आवडतात, असा टोलाही राऊतांनी लगावला.
देशात लोकशाहीचा मृत्यू होत आहे. राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीनेच संसदेचे कामकाज चालते. ते लोकशाही, संसदेचे संरक्षक आहेत. मात्र, आता त्यांनाच डावलले जात आहे, असेही राऊतांनी यावेळी म्हटले.