उताराही घटला ः आगामी गाळप हंगामासाठी नव्या उपाययोजनांची गरज
लोणी काळभोर : गेल्या ऊस गळीत हंगामामध्ये एकरी ऊस उत्पादन 28 टनांपर्यंत घसरले असून, कारखान्यांचा ऊस विकास विभाग, कृषी विभागामध्ये आधुनिकीकरण आणि सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे ठरत आहे. दैनंदिन गाळप क्षमता वाढूनही केवळ कारखान्यांची संख्या वाढल्याने यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच समाप्त झाला. आगामी हंगामासाठी नव्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
गत हंगामामध्ये 198 सहकारी, खासगी कारखान्यांनी कारखान्यांनी दैनंदिन 8 लाख 28 हजार 650 टन क्षमतेने गाळप करत 10.40 टक्के उतारा ठेवत 1140.94 लाख मे. टन उसाचे गाळप करत 1186 क्विंटल साखर उत्पादित केली होती. चालू हंगामामध्ये कारखान्यांची भर पडून ही संख्या 210 वर पोहोचली. चालू हंगामामध्ये कारखान्याची संख्या वाढली त्याप्रमाणे दैनंदिन गाळप क्षमताही वाढली. दैनंदिन गाळप क्षमता 8 लाख 84 हजार 950 लाख मे. टनावर पोहोचली.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात 166 कारखान्यांनी हंगाम संपविला. आतापर्यंत 1045.35 लाख मे. टन उसाचे गाळप करून 1041.66 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. गतवर्षीपेक्षा साखर उतारा मात्र घटला. गतवर्षीच्या हंगामासह यावर्षीच्या हंगामाची तुलना केल्यास असे निदर्शनास येते की, राज्याची एकूण गाळप क्षमता 56 हजार 300 मेट्रिक टनने वाढली, पण गाळप 95.59 मेट्रिक टन कमी झाले. साखरसुद्धा 144.54 लाख क्विंटलने कमी झाली. तसेच साखर उतारासुद्धा 0.44 टक्क्याने कमी झाला असे निदर्शनास येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे उसाचे दर एकरी उत्पादन कमी झाले.
ऊस उत्पादन घटण्याची कारणे
पाण्याचा अतिवापर, समतोल खताची मात्रा न देणे, आंतर मशागत योग्य न करणे, प्रमाणित बेण्याचा वापर कमी होऊन खोडवा पीक बेणे म्हणून वापर करणे, प्रत्येक 3 वर्षांनी बेणे बदल न करणे, पिकाची फेरपालट न करणे, आंतरमशागत वेळेवर न करणे, शेती विभागात कृषी पदवीधर कर्मचारी नसणे, ऊस पीक परिसंवाद आयोजित न करणे, कीड रोग नियंत्रण न करणे आदी बाबींमुळे दर एकरी उसाचे उत्पादन कमी झालेले दिसत आहे.
ऊस विकास विभाग सक्षम करावा
साखर कारखान्यांची संख्या एका बाजूला वाढते आहे. दैनिक गाळप क्षमता वाढत आहे; परंतु ऊस हा कच्चा माल जो कारखाने खरेदी करीत आहेत, त्यासाठी ऊस विकास विभाग अतिशय सक्षम होणे जरुरी आहे. ऊस विकास विभाग स्वतंत्र तयार करून वरील बाबी शेतकऱ्यांकडून करून घेण्यासाठी ऊस विकास विभागात कृषी पदवीधर यांची आणि कृषी पदविकाधारक यांची नेमणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कारखाने दुरुस्तीसाठी लागणारे मटेरियल खरेदी करताना 3 कोटेशन घेतात, पण एका गाळप हंगामासाठी हजारो टन ऊस कोट्यवधी किमतीत खरेदी करीत असताना त्याच शेती विभागाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांचे आधुनिकीकरण करणे जरुरीचे आहे, याचा योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे.
वजनकाट्यांवर शंका
हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तर यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखाना बंद असल्याने अपवाद वगळता बहुतेक सर्व शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळांना देतात. उसाने भरलेला ट्रॅक्टर शेतातून निघून गुऱ्हाळाकडे येताना रस्त्यावरच्या ठराविक वजनकाट्यावर त्याचे वजन केले जाते. संबंधित वजनकाटा योग्य वजन दाखवतो की कमी वजन दाखवतो, याबद्दल कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे नक्की एकरी किती ऊस उत्पादन निघते याबाबतीत सर्वच शेतकरी अनभिज्ञ आहेत.