नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतर काँग्रेसने एक ठराव पास केला होता आणि मुस्लीम समुदायाला आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी बाबरी पुन्हा बांधण्यात येईल असे म्हटले होते. आज त्या जागेवर काय बांधलं जातं आहे? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. काँग्रेस पक्ष आश्वासनं देतो पुढे ती हवेत विरतात असा आरोप देखील औवैसींनी यावेळी केला आहे.
असदुद्दीन ओवैसींनी प्रचार दरम्यान, बोलताना,“देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस पक्षाने ठराव पास केला होता आणि बाबरी मशिद त्याच जागी बांधू. आता तिथे काय बांधलं जातं आहे? निवडणुकीच्या आधी तर अनेक आश्वासनं दिली जातात पुढे काय होतं त्याचं? ते सगळ्यांना माहित आहे. दुसरी गोष्ट अशी की भाजपाच्या जगदीश शेट्टर यांना काँग्रेसने आपल्या पक्षात घेतलं. जगदीश शेट्टर यांची हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेली. त्यानंतर ते भाजपात होते. आता काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. हे नेमकं काय धोरण आहे? मला तरी ते कळत नाही. आता निवडणुकीच्या नंतर कर्नाटकात काय होतं पाहू.” असे म्हटले आहे.
भाजपाने मुस्लीम मतं विभाजन करण्यासाठी ओवैसींनी बोलावलं आहे का? असा प्रश्न विचारला असता ओवैसी यांनी, “माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की राहुल गांधींना हरवणारा मी आहे. राहुल गांधींना मी आस्मान दाखवलं. २०१९ ला किती खासदार आले? एकच ना? त्यांचे एकूण जे खासदार निवडून आले ते माझ्यामुळे आले. त्यांचे जे खासदार, नेते, कार्यकर्ते भाजपात गेले ते माझ्या घरी जेवायला आले होते मीच त्यांना सांगितलं भाजपात जा.” असे म्हणत ओवैसी यांनी खोचक टोलेबाजी केली आहे.
काँग्रेसवाले बकवास आहेत. कर्नाटकात आम्ही दोन जागा लढत आहोत. तुम्ही लढा ना तुम्हाला कुणी अडवलं आहे? उर्दूमध्ये एक म्हण आहे नाच ना जाने आँगन टेढा. काँग्रेसची अवस्थाही तशीच आहे असेही ओवैसी यांनी म्हटले आहे. तसंच या निवडणुकीत काँग्रेसच्या आश्वासनांना भुलू नका असेही त्यांनी म्हटले आहे.