छत्रपती संभाजीनगर – राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर अनेक बदल घडून आले. अनेक खासदार, आमदार आणि नेत्यांनी सत्तांतरण केले. यातच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण यांचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याशी जमत नाही. अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या घडामोडींवरून अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील, असे मला वाटते. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे.”
दरम्यान, यापूर्वी संजय शिरसाट यांनी केलेले दावे खरे ठरले आहेत. त्यामुळे आता अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार का? हे पाहावे लागणार आहे. यावेळी शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर देखील टीका केली आहे.
सुषमा अंधारे या शिरसाट यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. यावर शिरसाट म्हणाले की, “सुषमा अंधारे हा विषय माझ्यासाठी संपला आहे. ती बाई प्रसिद्धीसाठी सर्व काही करत आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी आधीच सांगितले आहे की, तुम्ही महिला आयोगाकडे, पोलिसात जा. चौकशी झाली पाहिजे हे माझं मत आहे.”