मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. उन्हाळा चालू असतानाच अनेक भागात पाऊस बरसत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम पिकांवर होत आहे. यातच आता राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसह कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येणार आहे. तर 6 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र अन्य जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे.
अवकळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या दुपारच्या वेळी कडक उन्हाच्या झळा बसत आहे. तर संध्याकाळच्या वेळेत वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र येत्या 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.