पुणे -पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे भारतीय जनता पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे जानेवारीमध्ये निधन झाले. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे फेब्रुवारीत निधन झाले. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांचे मार्च महिन्यांत निधन झाले. मागील वर्षी ऑगस्टमध्ये 2022 मध्ये शिरूर-हवेलीचे भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले. या लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे भाजपने आघाडीचे नेते गमावले असल्याचे म्हटले जात आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने हा भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. शहरावर मजबूत पकड असलेला नेता बापट यांच्या रूपात भाजपने गमावला आहे, गेली चार दशके सक्रीय राजकारणातून भारतीय जनता पक्षाचा पाया बापाट यांनी शहरात अगदी भक्कमपणे रोवला होता. पुण्यात भाजपचा नेता कोण, तर बापट असे समिकरण पक्के झाले होते.
महापालिका ते लोकसभा अशा बापट यांच्या राजकीय प्रवासातून पक्षाचे शहरातील राजकारणातील महत्त्वही विषद होते. कसबा विधानसभा मतदारसंघाची अतिशय बारकाईने त्यांनी बांधणी केली होती. कसबा हा भाजपचा मतदार संघ म्हणूनच गेल्या तीन दशकात ओळखला जावू लागला होता.
याच कारणातून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होताच आजारी असतानाही बापट यामध्ये सक्रीय झाले होते. परंतु, कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवल्यानंतर बऱ्याच वर्षांनी हा मतदारसंघ भाजपला हातून निसटला होता. या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपने अर्थातच बापट यांनीही मोठ्या खिलाडून वृत्तीने स्विकारला होता. परंतु, बापट यांचे निधन हे भाजपला त्या पराभवा पेक्षाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.