मागील काही दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, ज्याचा भारताच्या सुरक्षेवरती परिणाम होतो आहे, त्याचे एक विश्लेषण.
अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिलाजवळ गुरुवारी लष्करी हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन लेफ्टनंट कर्नल व्ही. व्ही. बी. रेड्डी आणि मेजर जयंत ए. या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात नौदलाच्या आधुनिक हलक्या ध्रुव हेलिकॉप्टरला मुंबईच्या समुद्रात आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. भारतातल्या 1 लाख कोटींच्या शत्रू मालमत्ते’ची विक्री होणार आहे. देशातील 12 हजार 611 शत्रू मालमत्तांचा लिलाव होणार असून त्यापैकी 6 हजार 255 मालमत्ता एकट्या उत्तर प्रदेशात आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवाद संबंधित एका प्रकरणात काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. विविध प्रतिबंधित संघटना आणि त्यांचे सहयोगी विविध नावाखाली दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया घडवून आणण्याचा आणि गुन्हेगारी कट रचण्याचा प्रयत्न करत होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कारवाया आणि राजस्थानमधील हिंसक अतिरेकी अजेंडा या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.
चिनी व्हायरसचा विळखा पुन्हा वाढतोय
केवळ 24 तासांत देशभरात 1 हजार 71 बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चिनी व्हायरसचं संकट पुन्हा येण्याची भीती आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने लाइट कॉम्बॅट एअर क्राफ्ट, लिमिटेड सीरिज प्रोडक्शन (एलएसपी-3) विमानांवर पॉवर टेक ऑफ शाफ्टची (पीटीओ शाफ्ट) पहिली उड्डाण-चाचणी यशस्वीपणे केली आहे. या पॉवर शाफ्टची निर्मिती चेन्नईस्थित कॉम्बॅट व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटद्वारे करण्यात आली आहे. हा “आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा आहे.
भारतीय नौदल, समुद्रातील शक्ती वाढवण्यासाठी 200हून अधिक “ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. यासाठी नौदल 20 हजार कोटी रुपयांचा करार करणार आहे. “ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र समुद्रात शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी वापरले जाते. क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, “ब्रह्मोस एरोस्पेस’ पाणबुडी, जहाजे, विमाने आणि “लॅंड प्लॅटफॉर्म’देखील बनवते. बीएसएफने अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेनंतर आता सीआयएसएफतर्फे अग्निवीरांना आणखी 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. गतवर्षी केंद्र सरकारने “अग्निपथ’ योजना सुरू केली. केंद्र सरकारने कार्यकाळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना संरक्षण दलात सहभागी करून घेण्याची तरतूद केली होती.
सायबर युद्धाचा सामना करण्यास सज्ज
रशिया-युक्रेन युद्धाकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे. लष्कर आणि सैनिकांचे आधुनिकीकरण करण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान यांचा विकास भारत करत आहे. त्यामुळे चीनसह कोणत्याही देशाच्या सायबर हल्ल्यांचा सामना करण्यास भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले. भारतास पारंपरिक शस्त्रात्रे, सीमांची सुरक्षा, कमीतकमी कालावधीचे युद्ध याकडे विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करून शस्त्रे, रसद आणि तांत्रिक मदतीचा पुरवठा अविरत ठेवण्याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सायबर, एआयसारख्या युद्धावरही लक्ष ठेवावे लागेल.
युद्धाची व्याख्या बदलत आहे
आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या अमृतपालसारख्यांचा भारतीय शिखांशी कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन दल खालसाचे संस्थापक आणि माजी खलिस्तान समर्थक जसवंत सिंग ठेकेदार यांनी केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याचेही (सीएए) जसवंत सिंग ठेकेदार यांनी समर्थन केले आहे. सीएएद्वारेच अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणणे शक्य झाले आहे.
इम्रान खान यांचा पक्ष दहशतवादी?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) डझनभर नेत्यांवर तोडफोड, सुरक्षा जवानांवर हल्ला, तसेच भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालय परिसराबाहेर गोंधळ घालण्यात सहभागी असल्याचा आरोप करीत पोलिसांनी दहशतवाद विरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान 25 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. इम्रान खान यांच्या पीटीआयला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार तज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे. पाकिस्तान आणि आयएमएफ यांच्यात तब्बल सात अब्ज डॉलरचा करार होणार आहे. मात्र, चर्चा अंतिम टप्प्यावर आली तरीही पाकिस्तानला अद्याप पहिला हप्ता जाहीर झालेला नाही.
इम्रान खान यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. देशाशी कोणताही व्यवहार आयएमएफने करू नये, सर्व काही निवडणुकांनंतरच करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. इम्रान खान आणि शेहबाज शरीफ यांच्यातील लढाईमुळे देशवासीय नरकयातना भोगत आहेत.
अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग
अमेरिकी सिनेटमध्ये अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून मॅकमोहन रेषा हीच भारत-चीनदरम्यानची सीमा असल्याचा ठराव सिनेटर जेफ मर्क्ले, सिनेटर बिल हॅगर्टी यांनी सिनेटमध्ये ठराव मांडला. यावेळी ते म्हणाले, चीनने भारत-प्रशांत महासागर क्षेत्राला गंभीर धोका निर्माण केला आहे. अशावेळी अमेरिकेने या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये भारताचा सर्वांत प्रमुख सहभाग आहे.
हा द्विपक्षीय ठराव अरुणाचल प्रदेश राज्याला भारताचा अविभाज्य भाग म्हणून मान्यता देण्यासाठी सिनेटचा पाठिंबा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वास्तविक नियंत्रणरेषेवरील स्थिती बदलण्यासाठी चीनच्या लष्करी आक्रमणाचाही निषेध त्यामध्ये करण्यात आला आहे. अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी वाढविण्यासही या ठरावामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या प्रस्तावात पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणांचा दावाही फेटाळण्यात आला आहे.
2023 मध्ये पाकिस्तान आणि चीन भारताच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारे, “मल्टिडोमेन युद्ध’ लढेल आणि त्याचा एक महत्त्वाचा आयाम असेल माहिती युद्ध, जेप्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून लढले जाईल. अपप्रचारयुद्ध, मानसिक युद्ध करून भारतीय जनतेचे मत परिवर्तन करणे, त्याचा मुख्य उद्देश असेल. त्यामुळे या विरोधात भारताने वेळीच सर्तक राहून ठोस पावले उचलायला हवी.