“इस खेल में आदत लगना और आर्थिक जोखीम संभव है, जिम्मेदारी से खेलें,’ अशी स्पष्ट सूचना असूनसुद्धा ज्यांना रमी आणि ल्यूडो खेळायचाय, ते खेळतातच! अनेकांनी आर्थिक पातळीवर स्वतःचं वाटोळं करून घेतलंय, तरी गेम सुटत नाही.
मुलांनी पालकांच्याच मोबाइलवर गेम खेळताना त्यांचेच पासवर्ड वापरून बॅंक खाती रिकामी केल्याच्या घटना वेळोवेळी समोर आल्यात. मोबाइल गेममुळे एका बाजूला अशा जुगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वाढ होत चाललेली असताना दुसरीकडे हिंसक प्रवृत्ती वाढवणाऱ्या गेमचे निर्मातेही आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत. ब्लू व्हेल, पोकेमॉन गो यांसारख्या खेळांनी लहान पोरांना अक्षरशः वेड लावलं आणि अनेक मुलांनी आत्मघातही करून घेतला. त्यानंतर 2019 मध्ये आला “फ्री फायर’ गेम.
या गेमच्या नादानेही अनेकजण खुळावले. आईवडील मोबाइल देत नाहीत म्हणून पोरांनी घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचे सगळे मार्ग अवलंबले, एवढं हे व्यसन खतरनाक आहे. “फ्री फायर’ गेमची टूर्नामेन्ट खेळण्यासाठी तीन मुलं घर सोडून पळाली होती आणि मुंबईच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी पकडून त्यांना पालकांच्या स्वाधीन केलं होतं. एकट्याने परगावी जाण्याचं धाडस या मुलांना एरवी झालंच नसतं; पण गेमची नशा काहीही घडवून आणते. या हिंसक आणि गोळीबाराचा अतिरेक असलेल्या गेम्समुळे तामसी वृत्ती वाढीस लागते, हे सगळेच जाणतात; पण…
शहाणपण शिकवण्याची असंख्य माध्यमं अगदी पूर्वीपासून अस्तित्वात असूनसुद्धा जो बदलत नाही, तो खरा समाज! आपलं नुकसान होणार आहे, हे ठाऊक असूनसुद्धा खड्ड्यात उडी घेतो, तो धाडसी माणूस! अशाच काही मंडळींनी जुगारी प्रवृत्ती आणि हिंसक प्रवृत्तीचं “फ्यूजन’ घडवून आणलं आणि मग व्हायचं तेच झालं. “फ्री फायर’सारखा हिंसक गेम जालन्यातल्या काही मंडळींनी जुगारासारखा पैसे लावून खेळायला सुरुवात केली. त्या पैशांच्या देण्या-घेण्यावरून जे घडलं, ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं.
पैसे हरलेल्या गटाचा जिंकलेल्या गटाशी वाद झाला आणि तो मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. पण वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला आणि चक्क सुरे आणि खंजीर बाहेर निघाले. या घटनेत दोनजण गंभीररीत्या जखमी झालेत आणि काहीजण किरकोळ जखमी झालेत. उरलेले पोलिसांच्या चौकशीत गुरफटलेत. जखमींचे नातेवाईक हतबलपणे हॉस्पिटलमध्ये बसलेत. आरोपींना पकडून कडक कारवाई करा, अशी मागणी करताहेत. अशा गंभीर घटनेनंतर तरी या मंडळींचा गेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल? गेममध्ये ज्याप्रमाणं हातात व्हर्च्युअल बंदूक असते, तशी खरोखर या तरुणांच्या हातात आली, तर ते प्रतिस्पर्ध्याचं काय करतील? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात.
पन्नास जणांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये आपल्याला व्हर्च्युअली एका बेटावर सोडलं जातं. तिथल्या 49 लोकांशी सामना करून आपल्याला शेवटपर्यंत टिकावं लागतं म्हणे! म्हणजे, स्वतःच्या अस्तित्वासाठी इतर सर्वांना ठार मारायचं. हातात बंदुकीऐवजी दगडाची हत्यारं दिली असती, तर या गेमनं आपल्याला थेट आदिम काळातच नेलं असतं. निदान जिंकणाऱ्याचा मेंदू तरी नक्कीच त्या काळात पोहोचत असणार… आणि हरलेले 49 जण… जिंकण्याची आस घेऊन दरवेळी नवा डाव खेळत राहणार…