मराठी नववर्षाचे आज स्वागत करीत असतानाच, जुनी पानगळ होऊन नवी पालवी फुटते तसे जुने वादविवाद विसरून नवी आनंदाची पालवी फुटली तरच नवीन वर्षाचे खऱ्या अर्थाने स्वागत केले, असे म्हणता येते.
गुढीपाडवा अथवा वर्षप्रतिपदा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे त्यास एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील विविध भागात नवं वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे करण्यात येत असले, तरी या सर्वांची तिथी मार्च-एप्रिलदरम्यान येते. तसेच संपूर्ण भारतात नव संवत्सर चैत्र महिन्यातच साजरी करण्याची परंपरा आहे. नव वर्ष भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे गुढीपाडवा, वर्षप्रतिपदा, होला- मोहल्ला, उगाडी, युगादी, विशु, वैशाख, काश्मिरी, नव रेह, चेटी चंड, चित्रेय तरुविजा इत्यादी.
परकीय शकावर शालिवाहनांनी विजय मिळविला तो दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो. तर याच दिवशी शालिवाहन शक नावाने कालगणना सुरू झाली. चैत्र म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभी करण्याची पद्धत रूढ झाली. फार पूर्वी कुठल्याही फार मोठ्या यशप्राप्तीनंतर गुढी उभी केली जाऊ लागली. गुढी हा शब्द स्त्रीलिंगी असून कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतीक म्हणून पुजले जाते.
जगभरात लोक स्थानिक परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने नव वर्ष साजरे करत असले तरी या सर्वांमध्ये एक साम्य म्हणजे महिन्यांची संख्या बाराच आहे. इंग्रजी वर्ष-जानेवारी, आर्थिक वर्ष- एप्रिल, व्यापारी वर्ष-कार्तिक, शैक्षणिक वर्ष- जूनपासून सुरू होते. एका वर्षात बारा महिने असले पाहिजे, अशी संकल्पना जगात पहिल्यांदा भारतीयांनी मांडली, असा पुरावा भारताच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. त्यानंतर इतर संस्कृतींनी ते अंगिकारलं असावं. भारतात नवं संवत्सरास अनन्यसाधरण महत्त्व आहे. याचा उल्लेख इतिहासात व पुराणात उपलब्ध आहे.
भारतीयांच्या दृष्टीने याचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, शास्त्रीय महत्त्व आहे. भारतीयांच्या मते, याच दिवशी भगवान ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली आहे व याच दिवसापासून सतयुगला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त करून अयोध्येत पुनरागमन केले होते. याच दिवशी, भगवान विष्णूने मत्स्यावतार धारण केला होता. प्रभुरामचंद्र व महाराज युधिष्ठीर यांचा राज्याभिषेक झाला तो हाच दिवस. प्राचीनकाळी भारतावर उत्तर-पश्मिम व उत्तरेकडून परकीय आक्रमण व अनन्य अत्याचार झाले. त्याचदरम्यान महेंद्रादित्या व मलयवती यांचा पुत्र विक्रमादित्याने भारतीयांचे संघटन व नेतृत्व करून परकीय आक्रमकांचा युद्धात पराभव केला.
त्यामुळे विक्रमादित्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणून विक्रम संवत/नव संवत असे नामकरण झाले. त्याचबरोबर या दिवसाचे शास्त्रीय कारण म्हणजे, पाडव्याच्या दरम्यान सूर्य वसंत संपतावर येतो व वसंत ऋतू सुरू होतो. याकाळात वातावरणात बदल होतो व समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हादायक वारा वाहणे सुरू होतो. शिशिर ऋतूत झाडाची पाने गळालेली असतात, यादरम्यान पुन्हा पालवी फुटू लागतात. निसर्ग व वनस्पती पुन्हा टवटवीत दिसू लागतात. याच काळात रात्र लहान व दिवस मोठा होत जातो. या पावन दिवशी, भारतीय आपल्या घरावर गुढी किंवा ध्वज लावतात. यास ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज असे म्हणतात.
त्या वेळी भारत परकीय गुलामगिरीत होता. त्यामुळे त्या काळात गुलामगिरी मानसिकतेत असलेल्या लोकांचे संगठन हा फार महत्त्वाचा विषय होता. आधुनिक भारतात दोन मोठ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चळवळी झाल्या. त्यापैकी एक स्वामी दयानंद सरस्वती यांनी “आर्य समाजा’च्या माध्यमातून केले, तसेच दुसरे स्वामी विवेकानंद यांनी “रामकृष्ण मिशन’च्या माध्यमातून केले. वरील दोन्ही चळवळी केवळ सांस्कृतिक अभ्युदय किंवा परिवर्तनापर्यंत नव्हत्या तर स्वातंत्र्य हेही त्यांचे उद्दिष्ट होते. स्वामी विवेकानंदांची इच्छा होती की, भारतात अशी व्यवस्था निर्माण व्हावी की जिच्या माध्यमातून सामर्थ्यवान, देशभक्त मनुष्यबळ निर्माण व्हावे. या चळवळींच्या माध्यमातून भारतीय समाजात असलेले दोष त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला.
वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा फक्त एक इव्हेंट नसून त्यास शास्त्रीय, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे. या मराठी नववर्षात जुने वाद-विवाद टाकून देऊन नव्या इच्छा-आकांक्षेने जगण्याला नवी पालवी फुटू द्या, तरच आयुष्याचा वेल आनंदाने वाढत राहील.