पुणे – राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग चौथ्या दिवशी शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज ठप्प राहिले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचारी संघटनांकडून या वेळी सांगण्यात आले.
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मंगळवारपासून (दि.14) शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, सहकार, कृषी आणि साखर आयुक्तालय, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, जलसंपदा विभाग, ससून रुग्णालय, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), भूमी अभिलेख, विवाह नोंदणी कार्यालय येथील दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. सुरूवातीला एक-दोन दिवस हा संप चालेल, असे वाटत असताना चार दिवसांनंतरही संप सुरूच आहे. त्यातच शनिवार-रविवार सुटी असल्याने सलग सहा दिवस नागरिकांची कामे होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त
या मोर्चामुळे लष्कर, बंडगार्डन आणि पूलगेट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ती फोडण्यासाठी तब्बल 90 वाहतूक पोलीस कार्यरत होते. आंदोलनात सुमारे 5 हजार कर्मचारी होते. ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत गेल्याने परिसरातील कोंडी सुटण्यास तब्बल दीड तास लागला.
या आंदोलनात सेंट्रल बिल्डिंगमधील कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयापाशी वाहतूक कोंडी झाली. हे कर्मचारी जिल्हा परिषद, कौन्सिल हॉल आणि पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असे चालत गेले. यामुळे येणारी वाहने अडकून पडली.