मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तरदुसरीकडे सत्ताधारी भाजपा नेत्यांकडून संजय राऊतांच्या या विधानाचा संचार घेण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी यावेळी, “संजय राऊत वेडे झाले आहेत. पवारांच्या हातात हात घालून शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही हा माणूस शांत बसण्यास तयार नाही. रोज वेगवेगळी विधान करणं, विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं, निवडणूक आयोगाला अर्वाच्च भाषेत बोलणं सुरु आहे.”असे म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना,“संजय राऊत सांगलीत गेल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. यांची परिस्थिती म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी झाली आहे. हे एकमेकांना संभाळून घेत आहेत. राज्याचं राहिलं हे लोकं देशाची भाषा बोलत आहे. कृपामाई रुग्णालयात खूप चांगलं आहे. तिथे राऊतांना दाखल करण्याची नितांत गरज आहे,” असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.
भाजपाला गल्लीतलं कुत्र विचारत होतं का? असे विधान उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेत केले होते. याबद्दल विचारलं असता गोपीचंद पडळकरांनी, “भाजपा अखंड देशभर आहे. ती महाराष्ट्रापुरती मर्यादीत नाही. उद्धव ठाकरेंकडे कोणतीही दूरदृष्टी राहिली नाही. त्यांना फक्त भाजपा आणि वरिष्ठ नेत्यांवर तोंडसुख घ्यायचं यापलिकडे काय येत नाही. आतासुद्धा त्यांनी शहाणं होतं, चांगला विचार केला पाहिजे. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही,” असे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे.