पाटणा – बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले असून मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केले आहे. यापुढे मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
नितीश म्हणाले की यापुढे आता जीव देईल, मात्र भाजपसोबत जाणार नाही.
2020 मध्येही मी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली होती. मात्र आघाडी करण्यासाठी त्यांनीच माझा पाठपुरावा केला. आता एकदा निवडणुका झाल्या की कोणाची किती ताकद आहे ते सगळ्यांच्याच लक्षात येईल.
दरम्यान, यापुढे कधीही नितीश यांच्या पक्षाशी युती करायची नाही असा ठराव भाजपच्या कार्यकारिणीत संमत करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर नितीश यांनी हे वक्तव्य केले आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले की जनता दलाचे काही नेते अशी अफवा पसरवत आहेत की नितीश पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतणार आहेत. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे.
नितीश यांनी जनादेशाचा विश्वासघात केला आहे. इतकेच नाही, तर मत बदलण्याची आपली शक्तीही त्यांनी आता गमावली आहे. यापुढे त्यांच्याशी युती न करण्याचा जो निर्णय केंद्राच्या नेतृत्वाने घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने या निर्णयाचा आम्हाला उपयोगच होईल.