डॉ. संजय कुलकर्णी व जोत्स्ना कुलकर्णी यांच्या जागतिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या युरोलॉजी हॉस्पिटलचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
किडनी व मूत्रमार्गातील विकारांसाठीच्या सर्व चिकित्सा व शस्त्रक्रिया आता एकाच छताखाली होणे शक्य
पुणे : व्यावसायिक संस्थांकडे आज मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी उपलब्ध आहे, मात्र तो कसा व कोठे खर्च करायचा याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळे हा निधी समाजातील योग्य घटकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. याचाच एक भाग म्हणून गरजू रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारी अशासकीय योजना डॉक्टरांच्या मदतीने निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगत यामध्ये शक्य तेवढी मदत करण्याची तयारी पाटील यांनी दाखविली.
पुण्यातील जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी व १९९० मध्ये ‘लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी’ शस्त्रक्रिया करणाऱ्या पहिल्या महिला सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी या दाम्पत्याच्या प्रयत्नातून साकारलेल्या ‘युरोकुल – कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टीट्युट’ या देशातील तिसऱ्या युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन काल दिनांक १ जानेवारी रोजी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बाणेर येथे मुंबई- पुणे बायपास रस्त्यावरील बिटवाईज टेरा टॉवर जवळ असलेल्या या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पद्मविभूषण डॉ. के एच संचेती, युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. दीपक किरपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या रुग्णालयाच्या माध्यमातून किडनी व मूत्रमार्गातील विकारांसाठीच्या सर्व चिकित्सा व शस्त्रक्रिया आता एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकणार असून याच हेतून ‘युरोकुल’ची स्थापना करण्यात आली आहे. या १०५ खाटांच्या रुग्णालयात १० खाटांचा अतिदक्षता (आयसीयु) विभाग आहे. शिवाय या ठिकाणी १० डायलिसिस बेड्स व ५ मॉड्युलर ओटीज असून जगभरातील प्रगत तंत्रज्ञान व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती डॉ. जोत्स्ना कुलकर्णी यांनी दिली.
वैद्यकीय क्षेत्रातील फार मोठे काम कुलकर्णी दाम्पत्य करीत असून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना यांच्या हातचा गुण आला, आजार बरा झाला की होणारा आनंद म्हणजे या दोघांचाही बँक बॅलन्स आहे असे सांगत चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “महिन्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त असलेले व उरलेले पैसे हे जर लोककल्याणाला वापरले गेले तर देशातील सर्वच समस्या संपतील. कुलकर्णी दाम्पत्याने कन्व्हर्जन टू सोशल कॉस्टचा हा वस्तुपाठ समाजाला घालून दिलेला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “सरकारही नागरीकांना स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ मागील एका वर्षाच्या काळात तब्बल ३ कोटी जनतेला झाला आहे. नजीकच्या भविष्यात ५० कोटी नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असून या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एका वर्षासाठी ५ लाख इतका आरोग्य उपचारांचा खर्च मोफत करता येणार आहे.”
२०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सीएसआरच्या माध्यमातून उभे केलेले तब्बल १,१०० कोटी रुपये हे समाजासाठी उपयुक्त विविध कामांसाठी खर्च केले गेले शिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे देखील अनेक कामे पार पाडली. आरोग्यासंदर्भातील योजनांचे लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, योजनांच्या खर्चाची मर्यादा दीड लाखांहून तीन लाख, पाच लाख करता येईल का हे पाहणे, जे आजार लोकांना होत नाहीत असे आजार यादीमधून काढून आणखी काही आजारांचा अंतर्भाव यामध्ये करता येईल का असा सर्वांगीण विचार फडणवीस यांनी केला. आजही ते ही जबाबदारी पार पाडत असून याचा फायदा देशभरातून मुंबईत उपचारास येणाऱ्या नागरीकांना होत आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
आरोग्य सेवा व उपचारांसंदर्भात मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने आमच्या २५० जणांच्या टीमने एक पोर्टल सुरू केले असून त्याद्वारे आम्ही गरजू रुग्णांना आर्थिक मदत करत आहोत आणि आम्ही करत असलेली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत असल्याने अनेकजण आम्हाला निधी देत आहेत, असेही पाटील यावेळी म्हणाले.
‘कुलकर्णीज् टेक्निक ऑफ युरेथ्रल रिकन्स्ट्रक्शन’ या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेली डॉ. संजय कुलकर्णी यांची पद्धत ही रूग्णांसाठी एक वरदान ठरली असून रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण यानंतर ४० टक्क्यांहून आता ९० टक्क्यांपर्यंत आले आहे असे सांगत डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या निमित्ताने युरोलॉजी क्षेत्रात पुण्याचे नाव जगभरात अधोरेखित होईल असे गौरवोद्गार पद्मविभूषण डॉ. के एच संचेती यांनी काढले.