नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध पुन्हा स्थापित व्हावेत अशी उबळ अनेकांना अधुनमधून येत असते. ते याची वकिली करतात. खेळ आणि राजकारण हे वेगळे ठेवले पाहिजे, असेही सांगितले जाते. मात्र, या सगळ्या चर्चा भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळल्या आहेत. त्यातून त्यांनी हे संबंध पूर्ववत होणार नसल्याचे अधोरेखित केले आहे.
एका वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की, टुर्नामेंट (क्रिकेट स्पर्धा) होतच असतात आणि याबाबत सरकारची भूमिका काय आहे, याची सगळ्यांना कल्पना आहे. काय होते ते पाहू. पण एक गोष्ट आहे की मी तुमच्या डोक्याला बंदूक लावली तर तुम्ही माझ्याशी बोलाल का? तुमचे शेजारी उघडपणे दहशतवादाचे समर्थन करत असतील तर काय करणार? या दहशतवाद्यांचे म्होरके कोण आहेत हे लपून राहिलेले नाही. दहशतवाद्यांचे कॅम्प कुठे आहेत? सीमेपलीकडचा दहशतवाद ही सामान्य बाब आहे असा विचार आपण कधीच करायला नको.
एक देश आपल्या शेजारच्या देशाच्या विरोधातील दहशतवादाचा स्पॉन्सरर असल्याचे मला एक उदाहरण सांगा. जगात असे कुठलेही उदाहरण नाही. र्आत ही काही असामान्य बाब नाही. मात्र, ती असाधारण नक्कीच आहे.
क्रिकेटच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे. एखाद्या देशाला दहशतवादाचा पुरस्कार करण्याचा अधिकार असल्याचे आपण कधीही मान्य करता कामा नये. जोपर्यंत हा प्रकार अवैध आहे असे मान्य केले जात नाही तोपर्यंत आपल्याला हा दबाव ठेवावा लागेल.
पाकिस्तानवर सतत दबाव ठेवावा लागेल. तो जोपर्यंत ठेवावा लागेल तोपर्यंत दहशतवादाने पोळले गेलेले लोक त्याविरुद्ध आवाज काढत नाहीत. या दहशतवादामुळे आपले रक्त सांडले आहे त्यामुळे या लढ्याचे नेतृत्व भारतालाच करावे लागेल.
#UK : बळजबरीच्या धर्मांतर प्रकरणी पाकिस्तानातील मुस्लिम धर्मगुरुसह 30 जणांवर ब्रिटनने घातले निर्बंध
पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कपमधून जर भारत बाहेर पडला तर भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान बाहेर पडेल, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. त्यामुळे काय होणार, कधी होणार, कसे होणार अशा चर्चांना तोंड फुटले आहे. बीसीसीआयने स्पष्ट काही सांगण्यापूर्वीच आता परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी आडवळणाने मात्र थेट शब्दांत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.