कोयनानगर(विजय लाड,प्रतिनिधी) – कोयना खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपाला ५५ वर्षं पूर्ण झाली. या ५५ वर्षांत या विनाशकारी भूकंपाने कोयना खोऱ्यात झालेल्या भेगा बूजल्या असल्या तरी असुविधांच्या जखमा अजून कायमच आहेत. भूकंपग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भूकंपग्रस्त दाखले देण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात सुरू झाली असली तरी भूकंपग्रस्तांना शिक्षण,आरोग्य, दळणवळण यासारख्या पायाभूत दर्जेदार सुविधा कोयना भागात नव्हे तर अख्या पाटण तालुक्यात कुठेही उपल्ब्ध नाहीत.कोयना भूकंप पुनर्वसन समितीस १० कोटी निधी मिळत असला तरी या मुलभूत गरजेवर तो खर्च होत नाही, हे दुर्दैव असल्याने कोयनेचे नाव मोठं असलं तरी लक्षण खोटं असल्याचे वास्तव आहे.
या विनाशकारी भूकंपामुळे कोयना विभागाचा इतिहास व भूगोल बदलला आहे. ११ डिसेंबर १९६७ ला पहाटे ४.२१ ला कोयना खोऱ्यात झालेल्या ६.६ रिश्टर स्केल क्षमतेच्या शक्तीशाली भूकंपाने कोयना खोऱ्यात क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. सुंदर परिसर यामुळे भेसूर झाला. साडेपाच दशकांपूर्वी भूकंपाने पडलेल्या भेगा मुजल्या असल्या तरी भूकंपग्रस्तांच्या असुविधांच्या जखमा अजून कायमच आहेत.२७ वर्षांत २ हजार शंभर लोकांना भूकंपग्रस्त दाखले देण्यात आले आहेत. भूकंपग्रस्तांना दाखले दिले, विविध विकासकामांसाठी धोरणात्मक निर्णय घेतला की आपली जबाबदारी संपली नाही हे लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यायला हवे. पाटण तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. दळणवळणाची बोंबाबोंब आहे. तालुक्यात दर्जेदार शिक्षणाची वानवा आहे.
दीड लाखांपेक्षा जास्त भूकंपाचे धक्के कोयना विभागाने पचवले आहेत. या शक्तीशाली भूकंपामुळे कणखर सह्याद्रीच्या डोंगररांगा कमकुवत झाला. या भूकंपग्रस्त विभागात गेल्या दोन वर्षापासून भुसखल्लनग्रस्त झाला आहे. पाटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सलानवर शेवटच्या घटका मोजत आहे.
उपजिल्हा रूग्णालय होणे सोडूनच द्या. आहे त्या पाटण ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारीच मिळत नसल्याचे चित्र आहे. आयएसओ मानांकन प्राप्त असणाऱ्या कोयना प्रकल्पात असणारा दवाखानाच आरोग्य विभाग कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालवत आहे.आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याने जनता बेहाल आहे.
दर्जेदार आरोग्य सुविधा व शिक्षण मिळत नाहीत. भूकंपग्रस्त जनतेला आरोग्य शिक्षण या पायाभूत सुविधा देण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी कंबर कसावी व या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्यावी हिच माफक अपेक्षा.
पालकमंत्री शंभुराज देसाई यांना छोटेसे पत्र …
करोना काळात तालुक्यातील लोकांना जगविण्यासाठी तुम्ही करोना सेंटर उभारुन आरोग्याचा महायज्ञ केला होता.आरोग्याचा महायज्ञ तालुक्यातील प्रत्येक विभागात गावागावांत झाला तर अनेक लोकांना जीवनदान दिले जाऊ शकते, वाचवले जाऊ शकते. तालुक्यात आरोग्य विभागाची मृत झालेली घडी तुम्ही बसवली तर तालुक्यातील जनता कायमस्वरूपी तुम्हांला डोक्यावर घेईल. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करणारे तुम्ही आहात. कोयना भूकंपात लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी जे काम केले. त्याप्रमाणे वेगळे कायम चिरंतर स्मरणात राहणारे काम आपल्या हातून व्हावे, अशा अपेक्षा लोक व्यक्त करीत आहेत.