सातारा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद उमटले. या वक्तव्याच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 25 मिनिटांच्या या बैठकीत उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आपली भूमिका मांडली व त्यांना पत्रही दिले. आता राज्यपालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी गांभीर्याने विचार करतील, असे उदयनराजे यांनी सांगितले.
या बैठकीचा तपशील आणि त्यासंदर्भातील माहिती उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ते म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत सर्व खासदारांची एकमत झाले आहे. राज्यपालांच्या विधानाची राष्ट्रपतींनी देखील दखल घेतली असून या प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिले आहे.
आता पंतप्रधान मोदी याबाबत गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे.” कृपया या विषयाकडे राजकारणाच्या नजरेतून पाहू नका, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. कोश्यारींच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी केलेल्या विधानाला भाजप जबाबदार नाही. मात्र, राज्यपाल इतके काही घडूनही माफी मागत नाही याची खंत आहे. कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे, पिंपरी, चिंचवड येथे एक दिवसीय बंद पाळण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.