सोयतकलन (मध्यप्रदेश) – भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी राहुल गांधींसोबत धर्म आणि अध्यात्मावर खुली चर्चा करण्याचे आव्हान मध्य प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी दिले आहे. या विषयावर राहुल गांधी यांना भाजप व संघाच्या नेत्यांपेक्षा अधिक ज्ञान असल्याचे त्यामुळे सिद्ध होईल असा दावाही त्यांनी केला आहे.
भारत जोडो यात्रेच्या मध्य प्रदेशातील शेवटच्या दिवशी आगर माळवा जिल्ह्यातील सोयतकलन शहरात पत्रकारांशी संवाद साधताना कमलनाथ बोलत होते. ते म्हणाले की राहुल गांधी यांची ही यात्रा प्रचंड यशस्वी झाली असून ते देशाच्या पुर्व ते पश्चिम भागासाठीही स्वतंत्र यात्रा काढण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशातील यात्रेदरम्यान, गांधींनी उज्जैनमधील प्रसिद्ध भगवान महाकाल मंदिराला भेट दिली होती आणि खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर मंदिरातही प्रार्थना केली होती. पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात धर्म आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसले. त्यावर विचारले असता, कमलनाथ म्हणाले, “मी भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदु परिषदेच्या नेत्यांना राहुल गांधींशी धर्म आणि अध्यात्माच्या मुद्द्यांवर माध्यमांसमोर चर्चा करण्याचे आव्हान देतो.
या चर्चेतून हे सिद्ध होईल की गांधींना धर्म आणि अध्यात्माचे ज्ञान या व्यक्तींपेक्षा जास्त आहे, असा दावा कमलनाथ यांनी केला. गांधींच्या भारत जोडो यात्रेचे मुख्य उद्दिष्ट देशाचे संविधान आणि संस्कृती वाचवणे हे आहे असे ते म्हणाले. या पदयात्रेमुळे लोकांमध्ये राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यास मदत झाली आहे जी भाजपने गेल्या आठ वर्षांत सोशल मीडियाद्वारे “विकृत” केली होती असा दावा कमलनाथ यांनी केला.