कराड – तीन ते चार महिन्याच्या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. जनतेच्या चेहऱ्यावरील आनंदच त्याची पोचपावती आहे. जनतेच्या मनातील निर्णय आम्ही घेतला असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार, अतिवृष्टीग्रस्तांना भरपाई आदी. शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून हे सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण औद्योगिक व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. महेश शिंदे, पुरुषोत्तम जाधव, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आदींची प्रमुख उपस्थित होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी जबाबदारी वाढली असून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. सातारा जिल्ह्यात 500 एकरामध्ये ऍग्रो इंडस्ट्री पार्क उभारण्यात येईल, अशी ग्वाही देत कराड विमानतळावर नाईट लॅंडिंगसह अन्य सुविधा मिळत असतील; तर हे विमानतळ एमआयसीकडे सुपूर्द करू, तसेच इतर आवश्यक सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असून आणखीही आवश्यक मदत करण्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
ना. शंभूराजे देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र जास्त असून कृष्णा-कोयना नद्यांमुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी ऍग्रो इंडस्ट्रीच्या धर्तीवर जिल्ह्यात उसाचे नवीन बियाणे, ऊस आणि सर्वच पिकांवर संशोधक केंद्र उभारण्याचा जिल्हा नियोजन समितीचा मानस आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी बळ द्यावे. तसेच जिल्ह्यातील डोंगरी भागात पावसाचे पाणी राहत नाही. त्यामुळे डोंगरी भागासाठी जलयुक्त शिवार योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
चव्हाण साहेबांची कारकीर्द आदर्शवत
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन उत्कृष्ठ असून करोनानंतर त्याला शेतकरी, जनतेचा मोठा उत्साह दिसून येत आहे. चव्हाण साहेबांची कारकीर्द महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून त्यांची राज्यातील कष्टकरी जनतेची नाळ जोडली होती. त्यांनी राजाचा सर्वांगीण विकास केला. आपण फक्त राजकारण करत बसलो; तर चालणार नाही. राजकारण खुर्च्या येतात-जातात. मात्र, सर्वसामान्यांची नाळ जोडण्याचा चव्हाण साहेबांचा गुण सावांनी आत्मसात करण्यासारखा आहे, असे गौरोवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
कराड विमानतळ एमआयडीसीच्या ताब्यात द्या
जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे कराड विमानतळ सध्या सामान्य प्रशासनाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून सिंधुदुर्ग विमानतळाच्या धर्तीवर कराड विमानतळही एमआयडीसीकडे द्यावे. असे झाल्यास पुढच्या कृषी प्रदर्शनापर्यंत विमानतळाचे काम प्रगतीपथावर असेल, असे सांगून जिल्ह्यासाठी ऍग्रो इंडस्ट्री उभारण्याचीही मागणी मागणी मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.
विलासकाकांनी कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन हे राज्यातील मोठे प्रदर्शन आहे. माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी या प्रदर्शनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. कृषी क्रांतीचे जनक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यातिथीनिमित्त शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहता यावे, त्यांना आधुनिक शेतीचे धडे घेता यावेत, या दृष्टीने त्यांनी हे प्रदर्शन सुरू केले असून आज त्याला राज्यभरात ओळख मिळाल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.