बारामती – तालुक्यातील माळेगाव येथील तरूणाचा लग्नानंतर पाचव्या दिवशी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन उर्फ बबलू अनिल येळे (वय 25 राहणार माळेगाव) असे मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी (दि. 19) सचिनचा विवाह झाला होता. तर गुरुवारी (दि. 24) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला. ज्या मंडपात सत्यनारायणाची पूजा घातली तिथेच मृतदेह ठेवण्याची वेळ आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लग्न म्हंटलं घरात आनंदाचा व उत्साहाचं वातावरण असते. असंच वातावरण माळेगाव मधील माळेगाव कारखान्याचे निवृत्त कर्मचारी अनिल पांडुरंग येळे यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने होते. नातेवाईक व मित्रपरिवारच्या साक्षीने शनिवार (दि 19) रोजी दुपारी शारदा नगर येथे लग्न समारंभ पार पाडला. त्यानंतर रविवारी व सोमवारी धर्मकुळाचाराप्रमाणे विधीवत देवदर्शनासाठी नवदांपत्य नातेवाईकांसह जाऊन आले. त्यानंतर मंगळवार (दि 22) रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली होती. सर्व कसं आयुष्य त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांप्रमाणे चालू होतं.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळे चालू होते आणि गुरुवारी पहाटे वर नवरा मुलगा सचिन याला पहाटे एक वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर नातेवाईकांनी त्वरित बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी नवरा मुलगा सचिन मृत पावल्याचे सांगितले. ही बातमी माळेगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. सर्वांची मने सुन्न झाली.
सचिनच्या घराकडे नातेवाईकांचा व मित्रपरिवाराचा लोंढेच्या लोंढे येऊ लागले. सचिनचा मृतदेह ज्या मंडपात सत्यनारायणाची पूजा घातलेली होती त्याच मंडपात त्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. येळे कुटुंबावर अतिशय दुःखद प्रसंग ओढावला. यावेळी सचिनच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा मित्रपरिवारचा नवरी मुलगी हर्षदाचा आक्रोश उपस्थित यांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या दुःखद घटनेने माळेगावसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी हर्षदाचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. हर्षदाच्या हातामधील मेहंदी व अंगावरील हळद तशीच होती. नवीन संसाराचे स्वप्न पाहिलेला या नवदाम्पत्यांमधील सचिनच्या मृत्यूने हर्षदाला मानसिक धक्का बसलेला पाहायला मिळाले. या धक्क्याने हर्षदा चे स्वप्न पूर्णतः उध्वस्त झालेले आहे. हर्षदाची मानसिक अवस्था खूपच वेदनादायी असून तिच्या पुढील आयुष्यासाठी आयुष्य पुढे जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. याची चिंता दोन्ही कुटुंबीयांसह सर्वांनाच लागली आहे.
अनिल पांडुरंग येळे माळेगाव कारखान्यातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांना तीन मुले सुनील, दीपक व सचिन यापैकी सचिनचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून दिलेले होते. येळे कुटुंबातील हे शेवटचं लग्न असल्याने सचिनचे आई-वडील अनिल व वंदना व भावांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. मुलगी नववधू हर्षदाचे मूळ गाव पिंपळा तालुका व जिल्हा परभणी आहे.