नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील प्रचारानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता गुजरातकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाशी भाजपची लढत असून, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नव्हे, तर मोदींच्याच नावावर मते मागितली जात आहेत. केंद्राच्या योजनांची जाहिरात करूनच लोकांची मते आणि मने जिंकण्याचा प्लॅन आखण्यात आला असून, गेल्या पाच वर्षांतील भाजप सरकारची गुजरातमधील कामगिरी कोणत्याही अर्थाने चमकदार नाही; परंतु तरीही कॉंग्रेस व आपच्या मारामारीत भाजपचा लाभ होईल, असे त्या पक्षास वाटत आहे. गुजरातमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचा प्रत्यय जो 2017 मध्ये आला होता, तसे यावेळी बिलकुल दिसत नाही.
निवडणुकांच्या घोषणांनंतर मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचा दौरा केला असून, गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ शहरात भाषण करताना, भाजपला विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्याचवेळी भारत जोडो यात्रेतील समाजकार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीवरून मोदींनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. मोदींनी सोमनाथ मंदिरात अभिषेक केला आणि बलसाडमध्ये रोड शोसुद्धा केला. परंतु या सगळ्यामध्ये एका महत्त्वाच्या घटनेकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. 17 नोव्हेंबरपासून तमिळ कार्तिक महिना सुरू झाल्याच्या निमित्ताने वाराणसीत काशी तमीळ संगमाचे पंतप्रधानांनी अधिकृतपणे उद्घाटन केले आहे. तमिळनाडू आणि काशी या शिक्षणाशी संबंधित देशातील दोन सर्वात महत्त्वाच्या आणि प्राचीन शैक्षणिक स्थळांमधील जुने दुवे पुन्हा शोधून, ते अधोरेखित करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत वाराणसीत काशी तमिळ संगमचे आयोजन करण्यात आले आहे.
तीस दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील लोकांना द्रविड संस्कृती आणि तमिळनाडूच्या पाककृती व संगीताची झलक पाहायला मिळत आहे. विद्वान, तत्त्वज्ञ, विद्यार्थी, व्यापारी, कारागीर आणि कलाकार यांना एकत्र येऊन ज्ञान व संस्कृतीची देवाणघेवाण करण्याची संधी यामुळे प्राप्त झाली आहे. बनारस हिंदू विद्यापीठ व इतर उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी या संगममध्ये सहभागी झाले असून, ते दोन प्रदेशांतील ज्ञान व संस्कृतीचा तुलनात्मक अभ्यास करतील, मग दस्तावेजीकरण करतील. हा उपक्रम स्वागतार्हच आहे. यामुळे तमिळी लोक व हिंदी भाषा यांच्यातील दरीही मिटवण्याचा प्रयत्न होत असल्यास ते चांगलेच आहे. परंतु भाजप हा उत्तर भारतातील पक्ष असून, तो आपली भाषा व संस्कृती दक्षिणेवर लादत आहे, अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषेच्या संबंधात वेगवेगळी वक्तव्ये करून वादाचे मोहोळ उठवले आहे. भाजपला दक्षिणेत हातपाय पसरायचे असल्यामुळेच आता हा प्रतिमा बदलण्याचा उद्योग सुरू झाला आहे, असे दिसते. तमिळनाडूच्या समृद्ध व प्राचीन संस्कृतीचा आक्रमकपणे प्रचार करून, तेथून राजकीय अवकाश व्यापण्याचा भाजपचा हेतू आहे.
तमिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार असून, जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची ताकद कमी झाली आहे. अशा वेळी दोन पक्षांपैकी एका पक्षाची जागा व्यापता येईल, असा भाजपचा आडाखा आहे. वाराणसी येथे केलेल्या भाषणात मोदींनी तमिळ वचने उद्धृत केली. तर संस्कृत आणि तमिळ या दोन्ही भाषांचा उगम शंकरापासून झाला, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले. अर्थात योगींच्या या उद्गारांमुळे तमिळनाडूत वादंग निर्माण झाला. तमिळ संगमच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या साधुसंतांना मोदी व योगींनी लवून नमन केले. त्याची दृश्ये व्हिडिओ समाजमाध्यमांतून सर्वत्र पसरवली गेली. विशेष म्हणजे, तमिळनाडूच्या सर्व जिल्ह्यांतील 2500 शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांना खास रेल्वेने वाराणसीत आणण्यात आले आहे.
चेन्नईची आयआयटी आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे सहकार्य या इव्हेंटसाठी घेण्यात आले आहे. प्रसिद्ध संगीतकार इलायाराजा यांनी वाद्यवृंदाच्या तालावर रुद्रपठन केले. वाराणसीचा हा सर्व सोहळा आणि मोदी यांचे भाषण तमिळनाडूच्या वृत्तवाहिन्यांवरून लाइव्ह दाखवण्यात आले. भाजपने “लुक साउथ पॉलिसी’ आखली असून, प्रत्येक राज्यासाठी पक्षाचे वेगवेगळे धोरण असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात “बुलडोझर’चे राजकारण घडवण्यात आले.
महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये “ईडी’चा वापर करण्यात आला. तर झारखंड आणि तेलंगणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि के. चंद्रशेखर राव यांना लक्ष्य करण्यात येत आहे. उलट तमिळनाडूत मात्र भाजपचा तमिळ संस्कृतीचा आधार घेऊन राजकारण करण्यावर भर राहिला आहे. गेल्या मे महिन्यात हैदराबादमध्ये भरलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दक्षिणी राज्यांसाठी व्यूहरचना निश्चित करण्यात आली. गेल्या सात महिन्यांत मोदींनी तमिळनाडूस चार वेळा भेट दिली आहे.
अमित शहा तर जेव्हा जेव्हा दक्षिणेचा दौरा करतात, तेव्हा तेव्हा तमिळनाडूतील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यास भेट देतात. केंद्रातील 45 मंत्र्यांचे तमिळनाडूतील दौरेही एकापाठोपाठ एक आखले जात आहेत. अशाच पद्धतीने यापूर्वी त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने लक्षणीय यश मिळवले आहे. ईशान्य भारतात भाजपचे 25 खासदार निवडून आले आहेत. 2024 मध्ये कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र, तेलंगण आणि केरळ या दक्षिणी राज्यांतून जास्तीतजास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यापुढे हळूहळू भाजपचे आव्हान उभे ठाकत आहे.
त्यात, आपल्या पक्षाच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मला रात्री झोप येत नाही, असे वक्तव्यही स्टॅलिन यांनी केले आहे. तमिळनाडूचे अर्थमंत्री पलनिबेल राजन यांनी सहकार खात्याचा कारभार आपल्याला पसंत नसल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यावर सर्वसामान्य नागरिक या खात्याच्या कारभारावर पूर्ण समाधानी असल्याचे उत्तर पेरियास्वामी यांनी दिले. स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी हे अनेक मंत्र्यांच्या खात्यात लुडबुड करतात, अशीही तक्रार आहे. कदाचित स्टॅलिन त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता असून, त्यामुळे जुने जाणते नेते आधीच नाराज आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, 2024 ची लोकसभा निवडणूक आणि 2026 ची विधानसभा निवडणूक द्रमुकच्या दृष्टीने आव्हानात्मक राहील, असे दिसते.