पुणे, दि. 17 -जागतिक तापमान वाढीमुळे अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे स्थलांतर केले जाते. मात्र, या नागरिकांना केवळ नुकसान भरपाई दिली जाते. त्यांचा शाश्वत विकास केला जात नाही असे मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
डेव्हलपमेंट सपोर्ट टीम आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हवामान बदलाचा महिलांच्या आरोग्यावरील परिणाम’ या विषयी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. केवळ तापमान वाढ या एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत न करता त्यावर परिणाम करणाऱ्या बाबींवर सुद्धा विचार केला पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मिटिरियालॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू, डेव्हलपमेंट सपोर्ट टीमच्या कार्यकारी विश्वस्त हरविंदर ऊर्फ मिनी बेदी यांच्यासह विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते. डॉ. रॉक्सी मॅथ्यू यांनीही मनोगत व्यक्त केले.