पुणे, दि. 17 -शहरातील नागरिकांना आपल्या समस्या तत्काळ महापालिकेपर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी पालिकेकडून “पीएमसी केअर’ ही हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. तसेच, फेसबुक तसेच इतर सोशल माध्यमांतूनही महापालिका नागरिकांच्या तक्रारी घेत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक तसेच कोंडीबाबत पुणेकरांना चुकीची माहिती दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नागरिकांनी वाहतूक कोंडी तसेच वाहतूक समस्येबाबत काहीही तक्रार अथवा सूचना केल्यास “पीएमसी केअर’वरून थेट वाहतूक पोलीस शाखेचा दूरध्वी क्रमांक देत तिथे तक्रार करण्यास सांगण्यात येत आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांना दिला जाणारा क्रमांक वाहतूक शाखेने जवळपास वर्षभरापूर्वीच बंद केलेला आहे. त्यामुळे “पीएमसी केअर’ या सेवेचा “केअरलेस’पणा नागरिकांसाठी मनस्ताप देणारा ठरत आहे.
महापालिकेने डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत “पीएमसी केअर’ ही नागरिकांसाठीची तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असून, इ-मेल, फेसबुकवरही तक्रार करता येते. तक्रार केल्यानंतर नागरिकांना तक्रार क्रमांक दिला जातो. अथवा सोशल मीडियावर तक्रार असल्यास तसा मेसेजही दिला जातो. शहरात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा हैराण झालेले वाहनचालक सोशल मीडियावर पीएमपी केअरवर वाहतुकीच्या तक्रारी करत आहेत. त्यात रस्त्यावर खड्डे पडणे, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग, बंद पडलेले सिंग्नल अशा तक्रारींचा समावेश आहे. मात्र, त्याला उत्तर देताना “पीएमसी केअर’कडून नागरिकांना वाहतूक कोंडीबाबत पोलिसांना संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात आहे. तर हा संपर्क करण्यासाठी 8411800100 या मोबाइलवर अथवा 020-26208225 हा लॅंडलाइन क्रमांक दिला जात आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही क्रमांक बंद आहेत.
हे आहेत सुधारित क्रमांक
दैनिक “प्रभात’च्या वाचकांनी ही बाब कळविल्यानंतर “प्रभात’च्या प्रतिनिधींनी या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधला असता हे क्रमांक बंदच असल्याचे समोर आले. तर जो मोबाईल क्रमांक दिला आहे, तो फक्त व्हॅट्सप मेसेजसाठी आहे. नागरिकांना तक्रार करण्यासाठी सध्या वाहतूक विभागाकडून 020-26685000 हा लॅंडलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेची तक्रार निवारण प्रणाली खरेच शहरातील माहितीबाबत अपडेट आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.