वेलिंग्टन – न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी नेतृत्व हाती आलेल्या भारताच्या हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) याने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माकडूनच काही चुका झाल्या, असे धक्कादायक विधान केले आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या अपयशाचे खापर फोडताना रोहितने संघातील फलंदाजांनाच लक्ष्य केले होते. तसेच आम्ही आक्रमक फलंदाजी करण्यात अपयशी ठरलो त्यामुळेच आमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असे रोहितने सांगितले होते.
#INDvsNZ | हार्दिकची युवासेना सज्ज! टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या रंगणार
मात्र, खुद्द रोहितच सलामीला फलंदाजीला येत होता. उपांत्य सामन्यात पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यानेच लोकेश राहुलसह डावाची सुरुवात केली होती. मात्र, भारतीय संघाला या सहा षटकांत आवश्यक वेगाने धावा करता आल्या नाहीत. दडपण झुगारून फलंदाजी केली गेली असती तर चित्र वेगळे दिसले असते असे रोहित सांगतो पण तोच दबावाखाली फलंदाजी करताना दिसत होता, असेही पंड्याने ( Hardik Pandya ) म्हटले आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने केलेला खेळ निराशाजनक होता व त्यामुळेच देशवासीयांसह आम्ही खेळाडूही निराश झालो. मात्र, आता नवी मालिका नवी सुरुवात सकारात्मकेने करणेच गरजेचे आहे. ही मालिका संघातील नवोदितांसाठी आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. संघात अनुभवी व नवोदित असा सुरेख समतोल आहे व त्यांनी निवड समितीने दिलेल्या संधीचे सोने करावे अशी अपेक्षा आहे, असेही पंड्या ( Hardik Pandya ) म्हणाला.
पंड्याने ( Hardik Pandya ) न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेवर मत व्यक्त केले असले तरी त्याने रोहितवर केलेली टीका अनेकांच्या नवलाची बाब ठरली आहे. पंड्याकडेच येत्या काळात टी-20 संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्याने रोहितला लक्ष्य करणे खूप काही सांगून जाणारे ठरले आहे. आता यावर रोहित शर्मा काय प्रतिक्रिया देणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.