नवी दिल्ली – कोविडमुळे जगभरातील अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे जगातल्या मोठ्या देशांनाही महागाई, बेरोजगारी, आणि आर्थिक मंदी सारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हाच फटका भारतालाही बसला असून त्यातून सावरण्यासाठी आम्ही काही जोखीम पत्करून नवीन उपाययोजना करीत आहोत, भारत ही जगातील 5व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
युवकांना नोकऱ्या प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. मोदी म्हणाले की, केंद्र सरकार युवकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम करत आहे.
ते म्हणाले हे वास्तव आहे की जागतिक परिस्थिती फारशी चांगली नाही. अनेक मोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करत आहेत. अनेक देशांमध्ये उच्च महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या समस्या शिखरावर आहेत. कोविड सारख्या रोगाची आपत्ती शतकातून एखादवेळी उद्भवते. यामुळे निर्माण झालेली समस्या शंभर दिवसांत नाहीशी होणार नाही. आम्ही आमच्या देशावर होणारा हा कोविडनंतरच्या स्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. हे एक आव्हानात्मक काम आहे. पण आपण आत्तापर्यंत वाचू शकलो आहोत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सरकारी नोकरीत निवड झालेल्या 75 हजार जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
केंद्र सरकारच्या 38 मंत्रालयातील विविध वर्गवारीत या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. ज्या पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनोग्राफर, पीए, आयकर निरीक्षक आणि एमटीएस यांचा समावेश आहे, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.केंद्र सरकारतर्फे पुढील दीड वर्षात दहा लाख युवकांना सरकारी नोकरी दिली जाणार आहे.