औरंगाबाद – राज्यात परतीच्या पावसामुळे शेती पीकांचे मोठे नुकसान झालेय. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून अनेकांकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे कोणी कर्ज सुद्धा देत नाही अशी स्थिती आहे.
अशातच औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव येथील एका शेतकऱ्याच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने त्या मुलाची व्यथा त्या व्हिडीओमधून मांडली होती. दिवाळीत कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत यासह इतर व्यथा त्या चिमुकल्याने मांडल्या. काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या चिमुकल्याशी आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला.
चिमुकला ऋषिकेशच्या कुटुंबियांसोबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व सोबत आहोत. जे काही करणं शक्य असेल ते सर्वकाही आम्ही करणार आहेत. धीर सोडायचा नाही, तुम्ही संकटातून जात आहात आम्हीही एका वेगळ्या लढाईत आहोत. त्यामुळे या लढाईत आपण एकमेकांना मदत नाही केली तर काय फायदा, त्यामुळे धीर सोडू नका.
अशी संकटे येतात आणि जातात आपण त्याचा सामना करूच, काही काळजी करू नका. चिमुकला ऋषिकेशसी बोलताना ठाकरे म्हणाले, काळजी करू नकोस आपण सर्व एकत्र आहोत. धीर सोडू नका, शांतपणे लढायचं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरेंनी ऋषिकेशच्या आजीसोबतही संवाद साधला. धीर सोडू नका, मोठं संकट आहे पण आपण त्याच्यासोबत लढू, काळजी करू नका पुन्हा नव्याने सर्वकाही उभं करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर दिला. चव्हाण कुटुंबियांची दिवाळी गोड होण्यासाठी यावेळी त्यांनी आर्थिक मदतही केली. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी देखील राज्य सरकारकडे केली. उद्धव ठाकरे यांच्या गटाने चिमुकला ऋषिकेशच्या शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.