रस्ते अपघातात होणारे मृत्यू आणि अपंगत्वांची वाढती संख्या पाहता विकासाचा महामार्ग समजले जाणारे रस्ते हे मृत्यूचे सापळे होत आहेत का? असा प्रश्न पडतो. रस्ते हे अर्थव्यवस्थेला चालना देणारा आधार मानले जातात; पण अपघातांमुळे होणारे मृत्यू हे अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवत नाहीत का?
महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यांत महाराष्ट्रामध्ये 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये 8 हजार 68 जणांचा मृत्यू झालाय; तर 14 हजार 200 जण जखमी झाले आहेत. राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतातील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता गेल्या काही वर्षांत केंद्रीय रस्ते आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्त्याच्या सुरक्षेबाबत अनेक उपाय केले आहेत. सुरक्षित पायाभूत सुविधा विकसित करणे, जनजागृती करणे, सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी, रस्ते सुरक्षा माहिती डेटा तयार करणे, वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना यासारख्या गोष्टीं सरकारकडून करण्यात आल्या; परंतु वाढत्या रस्ते अपघातामुळे हे प्रयत्न अपुरे पडले. यामागचे कारण म्हणजे त्याचे योग्य रितीने पालन न करणे. कडक कायदे असूनही त्याची भीती लोकांना वाटत नाही. परिणामी दररोज रस्त्यावर शेकडो अपघात होतात.
रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने 2019 मध्ये मोटार वाहन अधिनियम कायद्यातील तरतुदी कठोर करण्यात आल्या. त्याचबरोबर वाहन सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाचे निकष देखील लागू केले गेले. तरीही वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. विशेषत: रस्ते अपघातात दुचाकी वाहनांचा वाटा सर्वाधिक आहे. दुचाकी वाहनाचा अवजड वाहनासारखा उपयोग केला जात आहे. यातही सर्वात वाईट सवय म्हणजे गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे. दुचाकीस्वार असो किंवा चारचाकी चालक, तो गाडी चालवताना बराच काळ वाकडी मान करून मोबाइलवर बोलत राहतो. या सवयी भीषण अपघातांना निमंत्रण देण्यासारख्याच आहेत. यात वाहतूक पोलिसांचा ढिसाळपणा देखील जबाबदार आहे. तसेच अपघात झाल्यानंतर जखमीला तत्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असते. या ठिकाणी होणारा विलंब हा त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. बहुतांश वेळा नागरिक जखमी व्यक्तीची मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. विशेषत: रात्री-अपरात्री होणाऱ्या अपघातातील जखमी हा बराच वेळ रस्त्यावरच पडून असतो. राज्य सरकारकडून जखमींना देण्यात येणारी आरोग्य सुविधा आणि मदत यंत्रणादेखील त्रोटक आहे. परिणामी जखमींना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
एका सर्वेक्षणानुसार दुचाकी वाहनाच्या अपघातात जायबंदी होणारे 75 टक्के नागरिक हे हेल्मेटचा वापर करत नाहीत. कोणतेही शहर असो हेल्मेट सक्ती ही ठराविक काळापुरती लागू केली जाते. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्या मंडळींना दंड ठोठावलाही जातो. एवढे उपाय करूनही नागरिक स्वत:हून हेल्मेट घालण्यास उदासीन आहेत. रस्ते अपघाताचे महत्त्वाचे कारण म्हणजे दर्जेदार ड्रायव्हिंग स्कूलचा अभाव. केवळ वाहन परवाना काढून देण्यासाठी काही जण ड्रायव्हिंग स्कूल चालवतात. गुणवत्ताप्रधान ड्रायव्हिंग स्कूल असणे गरजेचे आहे.
एका आकडेवारीनुसार रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडण्यामागे 80 टक्के कारण चालक आहेत. बेदरकारपणे वाहन चालवत स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात आणणाऱ्या महाभागांना वेळीच वेसण घालायला हवे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून केले जाणारे उपाय काही दिवस प्रभावीपणे राबविण्यात येतात; परंतु कालांतराने पोलीस यंत्रणा सुस्त होते आणि कारवाईत शिथिलता येते. अन्यथा भारतात एवढ्या प्रमाणात अपघात होण्याचे काय कारण असू शकते?
अलीकडेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे वेगात गाडी चालवणे आणि वाहतूक नियमांचे पालन न करणे. 2010 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 2011 ते 2020 हे दशक रस्ते सुरक्षा दशक म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्याचा जगभरावर सकारात्मक परिणाम झाला, परंतु भारतात त्याचा लवलेशही दिसला नाही. गेल्या एक दशकात रस्ते अपघात कमी होण्याऐवजी वाढतच गेले आहे. चीननंतर भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. एका आकडेवारीनुसार, दरवर्षी भारतात अपघाताचे प्रमाण 12.42 टक्के वेगाने वाढत आहे तर अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण 29.16 टक्क्याने वाढत चालले आहे. हे सरकारी आकडे आहेत. बिगर सरकारी आकडे पाहिल्यास मृतांचा आकडा पाचपट अधिक आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी बारा लाखांपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडतात. त्याचवेळी यापेक्षा पाच पट अधिक लोक गंभीर जखमी होतात आणि त्यात बहुतांश जणांना अपंगत्व येते. यात युवकांची संख्या तीनचतुर्थांशपेक्षा अधिक आहे.
जागतिक पातळीवर एकूण वाहनांची संख्या पाहिल्यास भारतात वाहनांचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे; परंतु रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 12 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जगातील अनेक देशांनी वाहतुकीचे नियम अधिक कठोर केले असून त्यांनी जनजागृती अभियानाच्या जोरावर रस्त्यावरचे अपघात रोखले. भारतात गेल्या दोन दशकांत रस्ते अपघातात 75 टक्के वाढ नोंदली गेली आहे. यावरून भारतात वाहतुकीचे नियम कितपत पाळले जातात आणि त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे केली जाते, याचे आकलन करता येईल. रस्ते सुरक्षेसंदर्भात जारी केलेल्या जागतिक स्थितीच्या अहवालात रस्ते अपघात वाढण्यामागे पाच प्रमुख कारणे सांगण्यात आले आहेत. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, सिटबेल्ट न बांधणे, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे, मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे यासारख्या कारणांचा समावेश करता येईल. अर्थात ज्या वेगाने रस्त्याची उभारणी केली जात आहे, त्या तुलनेत रस्ते सुरक्षेचे उपाय योजले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी भारतात रस्त्यावरचे अपघात वाढत चालले आहेत. वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, हे देखील तितकेच खरे आहे. म्हणून आपल्या देशात दरवर्षी दीड लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू रस्त्यावर होतो. म्हणजेच दररोज 455 नागरिकांचा मृत्यू हा रस्ते अपघातात होतो.
गेल्या दहा वर्षांत देशात रस्ते आणि महामार्गाचे काम वेगाने झाले आहे. बहुतांश जिल्हे, तालुके हे राज्य, राष्ट्रीय महामार्गाने जोडले असून एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा कालावधी देखील कमी झाला आहे. एकीकडे रस्ते गुळगुळीत होत असताना भीषण अपघातामुळे या विकासकामावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका आकडेवारीनुसार राज्य किंवा ग्रामीण भागातील रस्त्याच्या तुलनेत एक्स्प्रेस वे वर होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. देशातील एकूण रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण 1.58 असले तरी अपघातातील एकूण मृत्यूंमध्ये 27.5 टक्के मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर होतात.
वाहतूक नियमांचे पालन, पादचारी रस्त्यावरून जात असताना खबरदारी घेणे, वाहन मर्यादित वेगात चालवणे, चारचाकी चालवताना सिटबेल्ट वापरणे, दुचाकीवर हेल्मेट वापरणे, ओव्हरटेकचा मोह टाळणे, गाडी सुस्थितीत असणे यांसारख्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास अपघाताचा आलेख खाली येऊ शकतो.