तळेगाव दाभाडे, (वार्ताहर प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातून तीन महामार्ग जातात. तर मावळ तालुक्यातही चाकण तळेगाव हा महामार्ग आहे. महामार्गासह शहरातील अंतर्गत रस्तेही प्रशस्त झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सहा वर्षांत झालेल्या अपघातात पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यात २०२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या दोन महिन्यात ५८ जणांचा बळी गेला आहे. प्राणांतिक अपघात रोखण्यात महामार्ग आणि वाहतूक पोलिसांना सपशेल अपयश आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यातही रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्राणांकित अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ता ओलांडत असलेला पादचारी वाहन चालकाला लवकर दिसून येत नाही. जवळ आल्यावर कधीकधी दिसतो मात्र तोपर्यंत वेळ निघून गेले असते. अपघातातील मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही विशेष म्हणजे हेल्मेट न घातल्याने डोक्याला मार लागून मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण यामध्ये अधिक आहे.
वेळेवर उपचार मिळत नाहीत
अपघात झाल्यावर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून जातात. त्याला दोन कारणे आहेत. आपण अपघात केला आहे हे पोलिसांना माहिती होऊ नये हे पहिले कारण आहे. तर दुसरे कारण म्हणजे अपघातस्थळी जमावाकडून मारहाण होण्याची शक्यता असते. मात्र अपघातस्थळी जमखीला वेळेवर उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. मात्र नागरिक त्या जखमीला रुग्णालयात नेण्याऐवजी सोशल मीडियावर टाकण्याासाठी चित्रीकरण करीत असतात.
पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार
अनेकदा नागरिक जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातात. तेथील डॉक्टरांकडून पोलिसांना माहिती देण्याबाबत सांगितले जाते. मात्र मदत करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस प्रश्नांचा असा भडिमार करतात की आपणच गुन्हा केला आहे काय, कशाला उगाच कोणाला मदत करण्याच्या भानगडीत पडलो, असे मदत करणाऱ्या त्या नागरिकाला वाटते.
वर्षभरात तीन पोलिसांचा अपघाती मृत्यू
९ ऑगस्ट २०२३ रोजी चाकण वाहतूक शाखेत कार्यरत असलेले योगेश ढवळे हे पोलीस कर्मचारी पंचप्राण शपथ घेण्यासाठी वाहतूक विभागाच्या कार्यालयात दुचाकीवरून चालले होते. तयवेळी त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. या अपघातात ढवळे यांचा मृत्यू झाला. याच महिन्यात दुचाकीवरून घरी चाललेल्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकातील राजेश कौशल यांचा अपघाती मृत्यू झाला.
तर तिसरी घटना सोमवारी (दि. १५) रात्री रावेत येथे घडली. देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सचिन शंकर नरूटे ( वय ३८) हे दिवसपाळी संपल्यावर दुचाकीवरून आपल्या घरी चालले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात नरूटे यांचा मृत्यू झाला.
आकडे बोलतात…
वर्ष दाखल गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे टक्केवारी
२०१८ ३४२ २३९ ७० टक्के
२०१९ ३२१ २२७ ७१ टक्के
२०२० २८४ २१५ ७६ टक्के
२०२१ ३१८ २३७ ७५ टक्के
२०२२ ३७४ २८३ ७६ टक्के
२०२३ ३८५ ३०७ ८० टक्के