तुमकुर – सध्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने कर्नाटकात पदयात्रा करणारे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी म्हटले आहे की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामैय्या यांनी एकत्रित काम केल्यास कर्नाटकात कॉंग्रेसचा विजय निश्चीत आहे. त्यानुसार आता हे दोन्हीं नेते एकत्र आले आहेत आणि यापुढेही ते एकत्रित कार्य करतील व पक्षाला कर्नाटकात यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या आत्तापर्यंतच्या 31 दिवसांच्या यात्रेत ही तिसरी पत्रकार परिषद होती. या दोन्ही नेत्यांमध्ये जे मतभेद आहेत त्याचा आपल्याला खेद नाही. कारण पक्षात मतभिन्नता व्यक्त करण्याला पुर्ण अधिकार आहे आमचा पक्ष हा फॅसिस्ट स्वरूपाचा पक्ष नाही याचाच हा पुरावा आहे असे त्यांनी नमूद केले.
कर्नाटकात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री कोण होणार असे विचारता ते म्हणाले की पक्षात कर्तुत्ववान नेत्यांची कमतरता नाही. निवडणुकीनंतर सर्व संबंधीतांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. कर्नाटकातील भाजप सरकारच्या भ्रष्ट राजवटीला येथील जनता कंटाळली असून महागाई व बेरोजगारीनेही ही जनता त्रस्त आहे. त्यामुळे या सरकारला येथील जनता सत्ताभ्रष्ट करील असा विश्वासही राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) व्यक्त केला.