Devendra Fadnavis On Rahul Gandhi | porsche car accident। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये नंबरप्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं होतं.
त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टाने त्याला अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायला लावला. दरम्यान, पोलीस आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील या अपघाताची दखल घेत प्रशासनांवर टीका केली.
काँग्रेसने राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी, ”बस चालक असो, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक असो, यांच्यापैकी कुठल्याही चालकाने चुकून एखादा अपघात केला, त्या अपघातात कोणाचा बळी गेला तर त्या चालकाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांच्या वाहनाची चावी घेऊन ती फेकून दिली जाते.
परंतु, त्यांच्याजागी एखादा श्रीमंतांच्या घरातला 17 वर्षांचा मुलगा असेल, जो दारू पिऊन पोर्शसारख्या कंपनीची महागडी कार चालवत असेल आणि त्याने एखादा अपघात केला, त्यात दोन जणांची हत्या केली तर त्याला काय शिक्षा होते? त्याला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते.” असे म्हटले आहे.
दरम्यान, आता राहुल गांधींच्या या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली होती. मात्र, बाल हक्क न्यायालयाने यासंदर्भातील तो निर्णय घेतला. त्यावर अपील करून पोलिसांनी हे प्रकरणी पुन्हा बाल हक्क न्यायालयात आणले आहे.
अशा परिस्थितीत एखाद्या घटनेचं राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून बघणं आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही. राहुल गांधी यांनी नीट माहिती घेतली असती, तर अशाप्रकारे त्यांनी विधान केलं नसतं.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.
राहुल गांधी काय? म्हणाले….
“निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? नुकताच एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातल्या श्रीमंत आणि गरिबांमधल्या वाढत्या दरीबद्दल प्रश्न विचारला होता.
त्यांना विचारण्यात आलं होतं की, आपल्या देशाचे दोन भाग तयार झालेत, एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत, यावर तुमचं मत काय? ही स्थिती कशी सुधारता येईल? यावर मोदी पत्रकारांना म्हणाले, तुमची काय अपेक्षा आहे? मी सगळ्यांनाच गरीब करू का?” असा सवाल केला होता.
न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढतोय
काँग्रेस नेते म्हणाले, मोदींनी त्या प्रश्नावर काय उत्तर दिलं हे महत्त्वाचं नाही. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो न्यायाचा. श्रीमंतांना आणि गरिबांना वेगवेगळा न्याय दिला जातोय तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्या मते व्यक्ती गरीब असो अथवा श्रीमंत, प्रत्येकाला सारखा न्याय मिळायला हवा. यासाठीच आम्ही लढत आहोत, न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढतोय. यांच्या (सत्ताधाऱ्यांच्या) अन्यायाविरोधात आम्ही लढत आहोत.” असे त्यांनी यातून सांगितले.