मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात आज मुंबईत दोन मैदानांवर होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांकडे लक्ष लागले आहे. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाषण तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचे भाषण होणार आहे. या दोन्ही भाषणांवरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्ही प्रमुख नेत्यांना आवाहन केले आहे. तसेच, कटुता संपण्याविषयीही अजित पवारांनी सूचक भाष्य केले आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर दोन्ही नेत्यांना अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सल्ला दिला आहे. “दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनी समंजस भूमिका घ्यावी. जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा अधिकार आहे. पण कुणाच्याहीबद्दल अनादराची भावना न दाखवता जी महाराष्ट्राची परंपरा आहे, तिला कुठेही बाधा लागणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने वागावं असं आवाहन मी करेन”, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले,“हे वाद आता इतके पराकोटीला गेले आहेत. त्यात कुणी पुढाकार घ्यायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शब्दानं शब्द वाढत जातो. एकानं आरे म्हटल्यावर पुढच्यानं कारे म्हणायचं. त्यातून ते इतकं खालपर्यंत जातं, की खालच्याही लोकांना वाटतं की आपण एकमेकांचे शत्रू झालो. असं नाहीये. तेवढ्यापुरतं आपापल्या भूमिका सांगण्याचं काम प्रत्येकानं करावं. पण एकदा राजकीय जोडे बाजूला ठेवले की सगळ्यांनी एकमेकांना सलोख्याच्या भावनेतून पाहावं”, असाही सल्ला अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना दिला.
“शेवटी प्रत्येकाची काय भूमिका आहे, काय उद्दिष्ट आहे हेही महत्त्वाचं असतं. कुठलीही गोष्ट फार काळ टोकाची राहात नाही. जसजसे दिवस पुढे जातील, तशी त्यातली कटुता कमी होईल. पोटनिवडणूक १३ नोव्हेंबरला लागली आहे. त्या निवडणुकीच्या निकालावरही सगळ्यांचं लक्ष राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरही बरंच अवलंबून राहील. चिन्ह गोठवलं जाणार का? हेही महत्त्वाचं आहे”, असे अजित पवार यावेळी म्हटले.