मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी सवांद साधला आणि वेदांता प्रकरणावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे आंदोलन सुरु केले होते. सीतारमण यांनी केलेल्या टीकेवर सामनातून संताप व्यक्त करत ही कुठली आगपाखड ? असं म्हणत काही सवाल उपस्थित केले आहेत.
वेदांतासारखा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रकल्प, त्यामुळे निर्माण होणारा लाखावर जनतेचा रोजगार एक झटक्यात हिरावला गेला, त्या दुःखाचा, वेदनेचा आहे. हे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये? या वेदनेचा हुंकार मराठी जनतेने देऊ नये? त्याचा जाबही केंद्र सरकारला विचारू नये? तो विचारला तर त्यावरूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आगपाखड करायची, हा कुठला प्रकार? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
सीतारमण यांच्याकडे मागितली या प्रश्नांची उत्तर
वेदांता प्रकल्प नको असे एखादे आंदोलन महाराष्ट्रात झाले का?
हा प्रकल्प गुजरातमध्येच व्हावा, अशी मागणी गुजरातमधील जनतेने कुठे आणि कधी केली?
फक्त केंद्र सरकारचीच मंजुरी बाकी असताना प्रकल्प महाराष्ट्रातून गायब कसा झाला?
महाराष्ट्राच्या मनात उसळणारे असे असंख्य रास्त सवाल आहेत. आधी त्यांचे जवाब द्या आणि मग विरोधकांवर आगपाखड करा असं सामनात म्हंटल आहे.वेदांता हा मोठा प्रकल्प गुजरातला गेला याचा पोटशूळ महाराष्ट्राला कधी होणार नाही. शिवसेना तर गुजरातला नेहमी जुळा भाऊ मानत आली आहे, पण प्रश्न महाराष्ट्राच्या न्याय्य हक्काचाही आहेच असं स्पष्ट मत यावेळी सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.