मुंबई – शरद पवार हे जेव्हा महाराष्ट्रात दौरा करतात त्या दौऱ्यानंतर राज्यात सत्तेत बदल होतो, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोमय्या म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेशिवाय चैन पडत नाही, त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे फक्त पैसे मोजायचे काम आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी भ्रष्टाचारी लोकांना दूर करण्याचे काम झाले, आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र लोकशाही आणि विकासाचा दृष्टीने पुढे चालला आहे. त्यांना शेख चिल्लीचे स्वप्न बघू द्या, असा टोला सुप्रिया सुळे यांना लगावला. सोमय्या आज डोंबिवलीतील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नवरात्र उत्सवात भेट देण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, न्यायालयावर, न्यायव्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे. निवडणूक आयोग पण आता न्यायालयाच्या भूमिकेत आहे. निवडणूक आयोगाची मागची कार्यपद्धती पाहिली तर ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्या बाजूने निर्णय होतो, ज्याच्याकडे बहुमत असेल तो सगळ्यात जास्त खरा आणि इमानदार पक्ष, बहुमत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, त्यामुळे सत्याचाच विजय होणार, धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, असे किरीट सोमय्या म्हणाले.