सातारा -जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे, पर्यटन वाढीसाठी आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करणे, जलसंपदा विभागाचे शेती सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वाला नेणे, साताऱ्याच्या एमआयडीसीमध्ये प्रकल्प आणणे, ग्रामीण भागात रस्त्यांची जाळे निर्माण करणे, जिल्हा नियोजनचा निधी 100 टक्के मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणे, यासाठी प्रशासनाने कामाला लागावे, जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन ठेवून पालकमंत्री या नात्याने काम करणार असल्याने अधिकाऱ्यांनी माझ्या कामाची पद्धत समजवून घेण्यासाठी त्यांची बैठक घेतली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी आज
जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन विविध प्रश्न, योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, “”जिल्हा नियोजन समितीमधील (डीपीसी) कामांसाठी निधी खर्च होणे आवश्यक असून तो 100 टक्के खर्च केला जाईल. त्यासाठी दि. 30 रोजी बैठक घेतली आहे. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करणार आहे. त्यासाठी 450 कोटींचा निधी नियोजित आहे. याशिवाय लागणारा निधी मंजूर केला जाईल.
सरकारचा प्रतिनिधी म्हणून सातारा व ठाणे जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, माध्यमे आपण सर्वांनी एकत्र काम करुन जिल्हा पुढे नेऊया. प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जन्मगाव असलेला हा जिल्हा असल्याने त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे पाटणमधील भूस्खलन, दरडप्रवण 9 गावांसाठी 500 घरे बांधण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला. तेच धोरण आता निश्चित केले असून, अशा गावांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.”
नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. कास रस्त्यावरील बांधकामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अभिप्रायासह सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितलेला आहे. जिल्हा रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी असून त्याबाबत आरोग्य खात्याच्या संचालकांना सूचना करणार आहे. डोंगरी विकासासाठी स्वतंत्र पॅकेज तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे आश्वासन देसाई यांनी दिले.
उपसमितीची दोनदा बैठक
मराठा आरक्षणासंदर्भात उपसमिती नेमली असून मराठा समाजाच्या मागण्या लवकर मार्गी लागण्यासाठी आम्ही या समितीच्या माध्यमातून गतीने प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आठवड्यातून दोनदा बैठका घेणार असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माफी मागितली असल्याने ते काय बोलले हा विषय संपल्याचे त्यांनी सांगितले.
कोण सत्यजित पाटणकर?
पालकमंत्री झाल्यानंतर तुमचे राजकीय विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांनी शुभेच्छा दिल्या का, या प्रश्नावर देसाई यांनी खोचक टीका करत “सत्यजित पाटणकर कोण? त्यांना लोकांमध्ये जायला जागा नाही म्हणून ते सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. मला आमदार, खासदारांनी शुभेच्छा दिल्या, अशी टिपणी त्यांनी केली.