कोथरूड, दि.26 (प्रतिनिधी) – पौड रस्त्यावरील राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) मधील सर्व्हे नंबर 111 आणि 112 या ठिकाणी रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने सुतारदऱ्याला वाली कोण? असे ज्या ठिकाणी समस्या आहेत. तेथे फलक लावण्यात आले आहेत.
सुतारदऱ्यातील समस्यांबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी. प्राधान्याने सांडपाणी लाइन स्वच्छ करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा अखिल सुतारदरा नागरिक मंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलीस मित्र संघटनांनी दिला आहे.
क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल सीताराम खाडे, संतोष सुर्वे, राजाभाऊ म्हाळुंगे, साहेबराव काळे, अशोक शेलार, नारायण तुपे यांनी प्रशासनास निवेदन दिले आहे. मनसेचे शाखाध्यक्ष किरण उभे यांनी सुतारदऱ्याला वाली कोण? असे फलक सर्वत्र लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सुतारदऱ्यात मुख्य रस्त्यावरून गेल्या आठ दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे. यातून डास तसेच अन्य कीटकांची प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे.
क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आल्यानंतरही सांडपाणी वाहिनी स्वच्छ केली गेलेली नाही. याचा निषेध करण्यासाठी परिसरात समस्या तेथे निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत.
सलग आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे सुतारदरा येथील डोंगर उतारावरून येणारा राडारोडा सांडपाणी वाहिनीत गेल्याने तो अडकून वाहिनी तुंबली आहे. जेट मशीन लावून त्यातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
– केदार वझे, सहाय्यक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय