श्रीमंत व गरीब राष्ट्रे अशी जगाची विभागणी नको
लिमा, दि. 26 – सदस्य राष्ट्रे असलेली अलिप्त राष्ट्रांची परिषद कालपासून येथे सुरू झाली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील श्रीमंत राष्ट्रांचे वर्चस्वाचा काळ संपला असून गरीब व श्रीमंत राष्ट्रे यांचे दरम्यानची दरी आता नष्ट केली पाहिजे. पेरूचे अध्यक्ष जनरल जुआन अल्वाराडो यांनी उद्घाटनाचे भाषण केले. ते म्हणाले, जगाची विषम विभागणी यापुढे चालू शकणार नाही. येथे जमलेले प्रतिनिधी जगाच्या अर्ध्या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
इंदिराजींचा संदेश
पंतप्रधान इंदिरा गांधींनी या राष्ट्रपरिषदेत एक संदेश पाठविला. त्यात त्या म्हणतात, अलिप्त व विकसनशील राष्ट्रांपुढे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी काही निश्चित योजना आखावी.
आता एसटीचीही प्लॅटफॉर्म तिकिटे
मुंबई – राज्यातील प्रमुख एसटी स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी तेथे प्रवेशासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची पद्धत सुरू करण्याचे एसटी महामंडळाने ठरविले आहे. तसेच वाहतूक कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तीन खास पथके नेमण्यात आली आहेत.
पुणे येथे गहू संशोधन केंद्र स्थापन होणार
कलकत्ता – भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे चालू योजनेत आणखी 15 गहू संशोधन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या 15 केंद्रांपैकी एक केंद्र पुणे येथेही स्थापन होणार आहे. अशी माहिती अ. भा. गहू सुधारणा प्रकल्पाचे समन्वय अधिकारी डॉ. एम. व्ही. राव यांनी दिली.