लोकमान्य टिळकांचे सहकारी, प्रभावी वक्ते, लेखक, महाराष्ट्रातील नाट्यचळवळीचे प्रणेते गणेश श्रीकृष्ण खापर्डे ऊर्फ दादासाहेब खापर्डे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1834 रोजी वऱ्हाडातल्या इंगरोली या गावात झाला.
दादासाहेब खापर्डे यांचे वडील इंग्रजी सैन्यात पुरवठा खात्यात लेखनिक म्हणून काम करीत असत. नोकरीनिमित्त त्यांची एका गावाहून दुसऱ्या गावी सतत बदली होत असे. त्यांचे बालपण अमरावती व नागपुरात गेले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. मात्र, त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असे. अकोल्याहून ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढील शिक्षणासाठी मुंबईत एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे कायद्याची एलएलबी ही परीक्षा पास झाल्यानंतर ते इ.स. 1885 ते 1890 दरम्यान आधी अमरावतीत सरकारी वकील म्हणून काम करू लागले. कालांतराने मुन्सफ या पदावर व नंतर उपायुक्त झाले. नोकरीचा कंटाळा आला म्हणून ती सोडून देऊन ते अमरावतीतच वकिली करू लागले.
आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे दादासाहेब लवकरच अमरावतीत लोकप्रिय झाले होते. त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत काम करायला सुरुवात केली. अमरावती म्युनिसिपालिटीत ते 16 वर्षे उपाध्यक्ष होते. लोकमान्य टिळकांशी संबंध आला म्हणून सरकारने त्यांना उपाध्यक्षपदावरून दूर केले. वर्ष 1897 मध्ये अमरावतीला भरलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. कलकत्ता येथे कॉंग्रेसने भरवलेल्या शिवजयंती उत्सवात त्यांनी लोकमान्य टिळकांबरोबर भाग घेतला होता.
दादासाहेब हे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल या त्रयीचे नेतृत्व असलेल्या कॉंग्रेसमधल्या जहाल गटात सामील होते. त्यांच्या कणखर व भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा मध्य प्रांतात दरारा असल्याने तेथे ते वऱ्हाडचे नबाब म्हणून ओळखले जात असत. वर्ष 1916 मध्ये बेळगाव येथे डॉ. ऍनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या इंडियन होमरूल लीगच्या संस्थापक-सदस्यांपैकी दादासाहेब एक होते. भारतातील कारभारात सुधारणा सुचविणाच्या निमित्ताने भारताच्या व्हॉइसरॉयला भेटायला गेलेल्या कॉंग्रेसच्या समितीमध्ये ते होते.
इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीत आपली बाजू मांडण्यासाठी इंडियन होम रूल संघाचे प्रतिनिधी म्हणून मे 1919 ते जानेवारी 1920 या काळात त्यांचा मुक्काम लंडनमध्ये होता. त्या काळात त्यांनी लंडनमध्ये अनेक जाहीर सभांमध्ये भाषणे केली. त्यांचे हावभाव, त्यांचा मर्म विनोद आणि हजरजबाबीपणा यांची ब्रिटिश वृत्तपत्रांनी दाखल घेतली होती. काही वृत्तपत्रांनी त्यांची तुलना मार्क ट्वेन यांच्याशी केली होती.
त्याकाळी महाराष्ट्रात नाट्यचळवळ नुकतीच बाळसे धरू लागली होती. दादासाहेब यांनी ह. ना. आपटे यांच्या कांचनगडची मोहना, जयध्वज आणि त्राटिका या नाटकांच्या जातीने तालमी घेतल्या होत्या. बालगंधर्व म्हणजे नारायणराव राजहंसांशी त्यांची मैत्री झाली. बालगंधर्व जेव्हा जेव्हा अमरावतीला यायचे तेव्हा दादासाहेब यांच्याकडेच उतरायचे. महाराष्ट्रातील नाट्यसंस्था आणि कलापथके यांना एकत्र आणण्याची कल्पना दादासाहेबांनी मांडली आणि यशस्वी केली. त्यातूनच नाट्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. ठरल्याप्रमाणे पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ दादासाहेब यांच्या गळ्यात पडली. त्यांचे निधन 1 जुलै 1938 रोजी झाले.