बीड – राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार स्थापन झाले आहे. मंगळवारी सरकारमधील 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपकडून 9 तर शिवसेना शिंदे गटातील 9 आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजप श्रेष्ठींकडून वेळोवेळी डावलल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अनेकदा पंकजा यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांनी आज माध्यमांशी बोलतानाही नाराजी उघड केली. मला मंत्रिपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा मंत्रिपद देतील, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.
पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राखी बांधली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं. मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.