नवी दिल्ली – महागाई, खाद्यपदार्थांवरील जीएसटी आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने सरकारविरोधात मोर्चा उभारला आहे. काँग्रेसने केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. याअंतर्गत देशभरात निषेध रॅली आयोजित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पक्ष 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत कृषी बाजार आणि किरकोळ बाजारांसह देशाच्या विविध भागांमध्ये निषेध रॅली आयोजित करेल. या निषेध रॅलीचा समारोप 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात पक्षाच्या 5 ऑगस्ट रोजी झालेल्या देशव्यापी आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोदी सरकार देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करण्यात अपयशी ठरले आहे.
पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेही रामलीला मैदानावरील सभेला संबोधित करणार आहेत. जयराम रमेश म्हणाले की, या रॅलीच्या पार्श्वभूमीवर राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर प्रदेश कॉंग्रेस कमिटी महागाईवर हल्ला बोल, चलो दिल्ली कार्यक्रमाचे आयोजन करतील.
मोदी सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा फटका भारतातील जनता सहन करत असल्याचा दावा त्यांनी केला. दही, ताक, पॅकबंद खाद्यपदार्थ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील अवाजवी करांमुळे महागाई वाढत आहे, तर सार्वजनिक मालमत्ता मित्रपक्ष भांडवलदारांकडे हस्तांतरित करणे आणि सैन्य भरतीच्या दिशाहीन अग्निपथ योजनेमुळे रोजगाराची स्थिती बिकट होत आहे, या सर्व जनताविरोधी धोरणांविरोधात काॅंग्रेस आक्रमक झाले आहे.