राजेंद्र मोहिते
कराड – नुकत्याच झालेल्या तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसला सपशेल अपयश आल्याचे दिसून आले. बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कराड दक्षिणसह उत्तरेतील काही भागात कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे बालेकिल्ल्यातच कॉंग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे या निकालांवरून दिसून येत आहे. –
कराड दक्षिणेत महत्त्वाची समजली जाणारी आर्थिकदृष्ट्या गब्बर ग्रामपंचायत, तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्वभूमीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालेल्या कोयना वसाहत ग्रामपंचायतीची सत्ता भाजप समर्थकांकडून मिळवण्याची कॉंग्रेसच्या आ. पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मनोहर शिंदे गटाने मोठी शिकस्त केली. परंतु, भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाने कॉंग्रेसचा हा एकत्रित मनसुबा धुळीस मिळवला. हा पराभव स्थानिक कॉंग्रेस गटाच्या जिव्हारी लागला असून यातून पक्षीय पातळीवरही बोध घेण्याची वेळ कॉंग्रेसवर आल्याचे बोलले जात आहे.
उत्तरेत मात्र राष्ट्रवादीने आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित यश मिळवत शितळवाडी, उत्तर कोपर्डे, पश्चिम उंब्रज व नाणेगाव बुद्रुक या चार ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. तर बेलवाडी ग्रामपंचायत मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक स्थानिक आघाडीने राखली आहे. याठिकाणीही राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली निराशा प्रकर्षाने जाणवली.
या सगळ्यात महाविकास आघाडीतील कॉंग्रेस हा एकमेव पक्ष सत्तेपासून बाजूला फेकल्याचे दिसून आले. तसेच एक पक्ष म्हणून उल्लेख करण्याजोगे यश कॉंग्रेसच्या वाट्याला न आल्याने कॉंग्रेस समर्थकांची मोठी निराशा झाल्याचेही यातून दिसून आले. त्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा टप्पाही तोंडावर असून यामध्ये कराड दक्षिण व उत्तरमधील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. त्यामुळे या टप्प्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाल्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांकडून बोलले जात आहे.
उंडाळकर गटाची हातमिळवणी
उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई आणि कॉंग्रेसच्या ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाने हातमिळवणी करत तब्बल 22 वर्षांनी सत्तांतर घडवले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला पराभव पत्करावा लागला. जरी ही ग्रामपंचायत पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असली, तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीला ती कराड दक्षिणमध्ये गणली जाते. त्यानुषंगाने पाहिल्यास येथील विजयात शिंदे गटाचाच गवगवा झाल्याने कॉंग्रेसला तितकेसे महत्व मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.